खा. उदयनराजेंसह आ. शिंदेंचा पाठिंबा : सरकार दखल घेणार तरी कधी?
सातारा – कराड विमानतळ विस्तारीकरणाच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मागील 13 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. एवढ्या दिवसानंतर देखील अद्याप सरकार व प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे असंतोषाचे वातावरण आहे, अशा परिस्थितीत खा. उदयनराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेत आंदोलनाला पाठींबा देत सरकार दरबारी प्रश्न मांडून सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या निर्णयामुळे दिडशे एकरापेक्षा अधिक क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपादित क्षेत्रामध्ये सिंचन योजना देखील जाणार असल्यामुळे तब्बल तीन हजार एकर क्षेत्र जिरायती होणार आहे. परिणामी शेतकरी देशोधडीला लागणार असल्यामुळे दि.29 जुलै रोजी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कुटुंबियांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. आता आंदोलनाचा तेरावा दिवस असताना सरकारच्यावतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झालेले आहेत.
दरम्यान, खा.उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली व लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तर आ.शशिकांत शिंदे यांनी देखील शनिवारी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यातील कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी.मोठ्या शहरांमध्ये विमानतळ विस्तारीकरण करण्यात आले. मात्र, त्या विमानतळांना नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. अशा स्थितीत कराड येथे विमानतळ विस्तार करून कितपत लाभ होईल हा संशोधनाचा विषय आहे. असे असताना विस्तार करून शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्यापेक्षा निर्णय रद्द झाला पाहिजे, ही मागणी सरकारकडे मांडणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.