पुसेगाव (प्रतिनिधी) – वर्धनगड घाटातील जिहे कटापूर योजनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आऊटलेट व्हाल्व्ह (दाब हरण कुंड) बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करत आऊटलेट बंद करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ग्रामस्थांनी हाणून पडला. या व्हाल्व्हमधून वाया जाणारे पाणी रामोशीवाडी (ता. कोरेगाव) तलावात जाऊन तो तलाव भरतो.
तलावातील पाण्याच्या पाझरामुळे तलावाच्या खालील विहिरींना, नाला बंडिगमध्ये पाणी भरून राहते. त्यांनी रामोशीवाडी, भाटमवाडीसह चिमणगावपर्यंतच्या विहिरींतून पाणी राहण्यासाठी मदत होत होती. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांच्या पाण्याची सोय उपलब्ध होत होती.
परंतु, जिहे कटापूर योजनेच्या अधिकाऱ्यांनी आउटलेट जाणारे पाणी बंद करण्यासाठी आज वर्धनगड घाटातील व्हाल्व्ह वेल्डिंग करून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता व हे व्हाल्व्ह बंद करण्यासाठी पोलीस संरक्षण घेतले होते. या व्हाल्व्ह बंद निर्णयाविरोधात आज रामोशीवाडी, भाटमवाडी तसेच चिमणगाव येथील ग्रामस्थांसह महिलांनी जोरदार विरोध करून जिहे कटापूर योजनेचे अधिकारी व पोलिसांना परत जाण्यास भाग पाडले.
हे पाणी येथील पिण्याचे पाणी जनावरांचे पाणी व शेतीसाठी मिळावे, यासाठी रामोशीवाडी, भाटमवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी, कोरेगावचे तहसीलदार, जिहे कटापूर उपसा सिंचन विभाग, तसेच मुख्यमंत्र्याना यापूर्वी अनेक वेळा निवेदन देण्यात आले असल्याचे सरपंच केशव मदने यांनी सांगितले. वारंवार मागणी करून देखील रीतसर मार्गाने या योजनेचे पाणी आजपर्यंत आम्हाला मिळाले नाही.
या योजनेमध्ये आमच्या जमिनी गेल्या, त्याचे मूल्यमापन नगण्य केले गेले, अगदी अल्प मदत कोणाला मिळाली तर अनेकांना मिळाली नाही. आउटलेटमधून वाया जाणाऱ्या पाण्यावर आमची तहान भागत होती. गेले दोन वर्ष हे पाणी आउटलेटमधून चार ते पाच वेळा सोडण्यात आले. त्या पाण्यावर बऱ्यापैकी पिण्याचा पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु, अचानकच जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकाऱ्यांनी आउटलेट व्हाल्व्ह बंद करण्याचा निर्णय घेतला.
या अन्यायाविरोधात आज व्हाल्व्ह बंद करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना येथील महिला व ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. व्हाल्व्ह वेल्डिंग करण्यापासून रोखले. या जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठीची समस्येची तळमळ व होणारा विरोध पाहून अधिकारी व पोलीस प्रशासनाने काढता पाय घेतला.
हे व्हाल्व्ह बंद करू नये म्हणून दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत महिला, तरुण वर्ग तसेच शेकडो ग्रामस्थ या व्हाल्व्ह बंदी विरोधात उभे होते. यावेळी जिहे कटापूर योजनेचे अधिकारी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार, कदम, तसेच महिला पोलिसांसह अनेक पोलीस उपस्थित होते. उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी परिस्थितीची पाहणी केली व मार्गदर्शक सूचना केल्या.
फेब्रुवारी महिन्यापासूनच या गावाला टँकरची मागणी होते. व्हाँल्व्हमुळे मागणी थांबून दोन वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु, राजकीय द्वेषातून खऱ्या अर्थाने हा व्हाँल्व्ह बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. गावच्या अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या. शासनाने येथील लहान मुले महिलांची दखल घेऊन या लोकांना न्याय द्यावा व येथील जनतेला मदत करावी.
– राजाभाऊ बर्गे ( माजी सभापती, कोरेगाव)
या तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी आहेत. दोन्हीही लोकप्रतिनिधींनी रामोशीवाडी, भाटमवाडी येथील पाण्याबाबतीत लक्ष घालावे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण आणू नये.
– मोहनराव जाधव (सरपंच, भाटमवाडी)