बेल्हे – चक्रीवादळाने जुन्नर तालुक्यातील खूप शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच शिंदेवाडीतील अंगणवाडीचे पत्रे उडाले असून दुरुस्तीच काम शाळा सुरू होण्याआधी पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या शेती पिकांच्या, घरांच्या आणि अंगणवाडी शाळांच्या नुकसानीची पाहणी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मंगळवारी (दि. 9) केली, त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर उपस्थित होते.
निर्मला पानसरे यांनी राजुरी, बेल्हा जिल्हा परिषद गटातील मंगरूळ पारगाव, गुंजाळवाडी, राजुरी, आळे, निमगाव सावा, तसेच पठार भागावरील शिंदेवाडी या गावांमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या केळी, डाळींब, पॉलिहाऊसची पाहणी केली.
दरम्यान, इतर पिकांप्रमाणे उसाला देखील शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या पाहणीच्या वेळी अमित बेनके, जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, राजुरीचे सरपंच एम. डी. घंगाळे, गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे, मंडलाधिकारी गंभीरे, राजश्री नरवडे, यांसह शेतकरी, तसेच जिल्हा आणि तालुक्यातील महसूल, तसेच कृषी अधिकारी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळात जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा व आश्रमशाळांचे एकूण 44 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळात शाळांचे छतांचे पत्रे व किचनशेडचे पत्रे उडाले आहेत. शाळेतील काही शैक्षणिक साहित्याचेही अतोनात नुकसान झाल्याचे शाळांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.