प्रयागराज – गोळीबारात ठार झालेल्या अतिक अहमदने धमकावून बळकावलेली मालमत्ता मूळ मालकांना परत करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. यासाठी एका आयोगाची स्थापना केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यामुळे अतिक अहमदच्या दहशतीमुळे जमीन किंवा घर गेलेल्या पीडितांना दिलासा मिळाला आहे.
प्रयागराजमधील झलवा येथे राहणाऱ्या जय श्री उर्फ सूरज कली यांची 12 बिघा जमीन अतिकने बळकावली होती. गेली 35 वर्षे याचा खटला सुरु आहे. सरकारच्या निर्णयामुळे कली यांनी मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानले आहेत. कली यांची 3 बिघा जमीन पीडीएमध्ये जमा झाली आहे.
अन्य 9 बिघा जमीनवर गृहनिर्माण सोसायटी उभी राहणार आहे. त्यासाठी अतिकने ही जमीन शिवकोटी सहकारी आवास समिती तयार करुन विकली आहे. कली यांचे पती बृज मोहन उर्फ बच्चा कुशवाहा हेदेखील 1989 मध्ये बेपत्ता झाले. त्यांचा अजून शोध लागलेला नाही. कली यांचा भाऊ प्रल्हाद यांचीही हत्या करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयाजवळ ही घटना घडली. या दोघांना तेथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार झाला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला झाला तेव्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.