मंत्री वळसे पाटील, आढळराव पाटील यांनी लक्ष घालण्याची मंचरकरांची मागणी
मंचर (प्रतिनिधी) – मंचर शहराचा वाढता विस्तार पाहता विकासकामांसाठी ग्रामपंचायतीवर काही प्रमाणात मर्यादा येतात. त्यासाठी मंचर येथे नगरपंचायत व्हावी. अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून सरकार दरबारी प्रलंबित आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचरकरांच्या नगरपंचायतीच्या मागणीकडे गांभीर्यांने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंचर ग्रामपंचायतीने नगरविकास विभागास नगरपंचायत होण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालय या ठिकाणी प्रलंबित आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मंचर शहरातील ग्रामस्थांच्या मागणीबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन नगरपंचायत अस्तित्वात आणावी, यामुळे शहराच्या वैभवात अजून भर पडेल.
पुढील तीस वर्षांचे नियोजन नगरविकास विभागाच्या वतीने आखण्यात येईल. मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी नगरपंचायत होण्याबाबत सर्व बाबींची पूर्तता केली असून, त्यांनी लवकरात लवकर नगरपरिषद जाहीर व्हावी, अशी अपेक्षा राज्य सरकारकडून ठेवली आहे.
चाकण, राजगुरूनगर, तसेच वडगाव मावळ येथे नगरपंचायत, नगरपरिषद अस्तित्वात आलेल्या आहेत. राजकीय भूमिका बाजूला ठेवून मंचर शहराचा विचार करता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करून मंचर नगरपरिषद करावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा सरचिटणीस संजय थोरात, संदिप बाणखेले, कैलास राजगुरव, प्रमोद बाणखेले, मंचर शहराध्यक्ष नवनाथ थोरात, युवा तालुका उपाध्यक्ष सुशांत थोरात यांनी केली आहे.
मंत्रालय स्तरावर निर्णय अपेक्षित
कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र संकीर्ण-2016/1466/नवि-466/नवि 18 दि. 30 डिसेंबर 2016 ला पत्र नगरविकास खात्याने पाठविले असून, त्या आधारे विविध कागदपत्रांची पूर्तता मंचर ग्रामपंचायत विभागाने केली आहे. यात काही त्रुटी असल्याने फाइल जिल्हा अधिकारी, नगररचना विभाग, नगरप्रशासन शाखा यांच्याकडे तीन वर्षे प्रलंबित होती. विविध मुद्दे आणि पूर्तता करून फाइल मंत्रालय स्तरावर पाठविली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे फाइल उशिरा पोहचल्याचा आरोप युवा तालुका उपाध्यक्ष सुशांत थोरात यांनी केला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील मोठे गाव
मंचर ग्रामपंचायत कार्यकारिणीची मुदत 23 ऑगस्ट 2020 ला संपत असल्याने नवीन कार्यकारिणी नगरपंचायत स्वरूपात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मंचर शहर हे तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. 102 गावांची बाजारपेठ आहे. मंचर येथे वाणिज्य व निवासी बांधकाम इमारत प्रकल्प मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, यामुळे शहराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या 21 हजारांवर गेली आहे. प्रभाग रचनेनुसार 50 हजारांच्या पुढे लोकसंख्या आहे. नागरीकरणाचा झपाट्याने विस्तार झाल्याने ग्रामपंचायतीवर काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. मंचर शहरामध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, महाविद्यालय, शाळा, सहकारी पतसंस्था, उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यालय आहेत. यामुळे मंचर शहरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. उत्तर-पुणे जिल्ह्यात मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे.