पूल पाडणे, नवा करण्याचा सगळा खर्च महामेट्रोला करावा लागेल : आयुक्त शेखर गायकवाड
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील दोन्ही उड्डाणपूल पाडण्याचा आणि नव्याने बांधण्याचा खर्च “महामेट्रो’लाच करावा लागेल. महापालिका केवळ यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल चुकीचे बांधले गेल्याचे सांगत ते पाडावे लागतील, असे मत व्यक्त केले होते. शहरातील वाहतूक कोंडीविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. हे पूल पाडण्याचे धाडसी निर्णय घेतले नाही तर, नागरिक माफ करणार नाहीत, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर आयुक्तांनी वरील मत दिले आहे.गणेशखिंड रस्त्यावर दुमजली पूल बांधण्याचा विषय सुरू आहे. मात्र, हा पूल बांधण्यासाठी महापालिका पैसा देणार नाही. हा उड्डाणपूल पाडण्याऐवजी अन्य पर्यायांचा विचार करणेही गरजेचे आहे, अशी भूमिकाही प्रशासनाने मांडली आहे.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे काम केले जाणार आहे. हा मेट्रो मार्ग गणेशखिंड रस्त्यावरून जात आहे. विद्यापीठ चौक आणि शिवाजीनगर येथे असे दोन उड्डाणपूल या मार्गावर आहेत. दोन्ही उड्डाणपूल हे पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या मेट्रोमार्गासाठी पाडावे लागणार आहेत. मेट्रोचे काम करताना दुमजली उड्डाणपूल बांधावे, अशी कल्पना मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने मांडली होती.
महापालिका प्रशासनाने पुलाचे काम पूर्ण केले आहे. आता हे पूल पाडायचे झाल्यास ते पाडण्यापासून ते पुन्हा उभारणी पर्यंतचा खर्च हा मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला करावा लागणार आहे. यासाठी अंदाजे 700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या कंपनीला हा पूल पाडणे आणि दुसरा बांधण्यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
…तर वाहतुकीचे नियोजन करावे लागणार
पूल पाडल्यानंतर पुन्हा नवीन पूल बांधण्यासाठी अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे या काळात या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. विद्यापीठ चौकातील पूल आणि म्हसोबा गेट येथील पूल पाडायचे झाल्यास वाहतुकीसाठी पर्यायी विचार करावा लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य गेट जर बदलले तर काही प्रमाणात येथील वाहतुकीची समस्या कमी होऊ शकते, असेही ते म्हणाले.