सातारा – सांगली व कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले. त्यानंतर राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला. सातारा जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. मात्र सातारकरांनी महापूरात अडकलेल्या नागरिकांसाठी पाठवलेली मदत सध्या पालिकेत एका सभापतीच्या दालनात सडत पडली आहे. या साहित्यामध्ये असणाऱ्या पीठाला कीडे लागले असून त्याचा उग्रदर्प येऊ लागला आहे. सातारकरांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला असून पालिका पदाधिकाऱ्यांचा कोडगेपणा या निमित्ताने समोर आला आहे.
माणुसकीच्या नात्याने पाठवलेल्या मदतीला उपेक्षेचे ग्रहण लागल्याने सातारा विकास आघाडीच्या ढिसाळ कारभाराने पूरग्रस्तांची जणू चेष्टाचं केली आहे. मागासवर्गीय समाजकल्याण सभापती संगीता आवळे यांच्या दालनाला चक्क स्टोअर रूमचे स्वरूप आले आहे. आवळे मेहेरबान सर्वसाधारण सभा वगळता कधीच त्यांच्या दालनात नसल्याने त्यांच्या दालनाला प्रचंड अवकळा आली आहे. 26 जुलै ते 11 सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टीने कमाल पावसाची नोंद केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला. सातारकरांनीसुद्धा कपडे, चादरी, धान्ये, इतर उपयोगी वस्तूंची प्रचंड मदत केली.
मात्र प्रशासन व पदाधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे ही मदत प्रत्यक्षात पूरग्रस्तांना पोहचलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ही घटना म्हणजे सातारकरांच्या संवेदनशीलतेची व महापूरात अडकलेल्या पूरग्रस्तांची चेष्टा झाली आहे आणि पालिकेचे व्यवस्थापन कसे कोडगे आहे. याचे झालेले विदारक दर्शन प्रचंड वेदनादायी आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या शक्ती प्रदर्शनाचा घाट घातला जात असताना पालिकेने मात्र सातारकरांच्या मदतीला कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे.
आवळे मेहेरबानांच्या दालनात प्रचंड धुळीत सातारकरांची माणुसकी अस्ताव्यस्त पडली आहे. तब्बल दीड महिना हे दालन अनेक प्रकारच्या पोत्यांनी खचाखच भरले आहे. मदत प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने काही मदत झटपट जाऊ शकली नाही, अशी छापील उत्तरे देणारे महाभागसुद्धा पालिकेत भेटले. ज्यांना सातारकरांच्या मदतीची काळजी घेता येत नाही ते सातारकरांच्या सुविधाची काय काळजी घेणार? असा रोखठोक सवाल सातारकरांचा लोकप्रतिनिधींना आहे.