काळदरी – पुरंदर तालुक्यात बुधवारी (दि. 25) अतिवृष्टी झाल्यामुळे डोंगर माथ्यावरील पाणी, दगड आणि मुरुम मोठ्या प्रमाणात सखल भागात जोराने वाहून आले होते. त्यामुळे पुरंदर किल्ल्यावर जाणारा तसेच किल्ल्यावरील वाहतुकीसाठी असणारे रस्ते वाहून गेल्यामुळे दि. 15 ऑक्टोबरपर्यंत पुरंदर किल्ल्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
याविषयी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, पुरंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. सद्यस्थितीत पुरंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता व किल्ल्यावरील मार्गाचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु, काही स्थानिक लोक व पर्यटक हे धोकादायक रस्ता असताना देखील त्या ठिकाणावरून प्रवास करीत असल्याने दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत आहे. दुरूस्तीचे कामास किमान 15 दिवस लागणार आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या घाट माथ्यावर जाण्यास तातडीने प्रतिबंध करण्यात आला आहे.