गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील प्रत्येक क्षेत्रात गैरव्यवहारांचे सिंडीकेट चालवले. मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच त्यांचा हा धंदा होता. तो त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अधिक फोफावला. आसामात आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या या प्रत्येक व्यवहाराची चौकशी केली जाईल असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केले आहे.
आसामच्या निवडणुकीची सारी सूत्रे कॉंग्रेसने बघेल यांच्याकडे सोपवली आहेत. त्या संबंधात ते गुवाहाटी येथे आले असताना पीटीआयशी बोलत होते. ते म्हणाले की सोनोवाल यांच्या बरोबरच हिमंत बिस्व शर्मा यांचाही या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये सहभाग आहे. ते कॉंग्रेस सरकार मध्ये आसामात अर्थमंत्री म्हणून काम पहात होते. त्याच वेळी भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत.
ज्या क्षणी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला त्याच वेळी ते सर्व आरोपातून नामानिराळे झाले. ते सारदा चीट फंड प्रकरणातही आरोपी होते त्यावेळी त्यांची सीबीआय मार्फत चौकशी का झाली नाही असा सवालही त्यांनी केला. गुरे, कोळसा, मासेमारी, अंडी अशा अनेक क्षेत्रात त्यांनी ही सिंडीकेट्स चालवून भ्रष्टाचार केला आहे असा आरोपही त्यांनी केला. जे चूक आहे ते चूकच आहे. त्यामुळे त्यांच्यावरील सर्वच आरोपांची आम्ही चौकशी करणार आहोत असे ते म्हणाले. ही चौकशी बदला घेण्याच्या भावनेतून नव्हे तर घटनेच्या चौकटीत राहुनच केली जाईल असे ते म्हणाले. या राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार असून तेथे शेवटच्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिललला होणार आहे.
भाजपकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना धमकावून फोडले जाते. भाजपने देशभर हाच फंडा सध्या वापरला आहे. तसाच तो त्यांनी आसामातहीं राबवला आहे. अर्थमंत्री शर्मा यांनाहीं भाजपने असेच फोडले. त्यांनीही सारदा चीट फंड प्रकरण तसेच लुईस बर्जर लाच प्रकरणातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश केल्याचा दावाहीं त्यांनी केला. आसामची जबाबदारी मिळाल्यापासून बघेल यांनी आसामचा केलेला हा चौथा दौरा आहे. ते मुख्यमंत्री सोनोवाल आणि शर्मा यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अधिक आक्रमक बनले आहेत. आसामात विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, एआययुडीएफ आघाडी, आणि आंचलीक गण मोर्चा या पक्षांबरोबर आघाडी केली आहे.