नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी पुन्हा इंडियाऐवजी भारत या नावाचा वापर करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे. रिझर्व्ह बॅंकेसारख्या संस्थांच्या नावांमध्येही इंडियाऐवजी भारत असावे, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भारत या नावाच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ऐवजी रिझर्व्ह बॅंक ऑफ भारत असे नवे नामकरण केले जावे, असे त्यांनी म्हटले. ब्रिटीशकालीन प्रघात अद्यापही कायम आहेत. इंडिया हा शब्द त्या काळातीलच आहे. तसे शब्द, प्रघात आता बदलायला हवेत. आता पुनरूज्जीवनाचा टप्पा आहे.
ब्रिटीशकालीन बाबी बदलायला एक मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) येण्यासाठी देशातील जनतेला 75 वर्षे प्रतीक्षा करावी लागली, असे भाष्यही सर्मा यांनी केले. त्यातून इंडिया की भारत यावरून सुरू झालेले राजकीय वादंग इतक्यात थांबणार नसल्याचे सूचित होत आहे. केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने देशासाठी भारत या नावाचा जोरदार आग्रह धरला आहे.