कामेरी -सातारा तालुक्यातील देशमुखनगर-कामेरी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम भर पावसात सुरू असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी “गांधारी’ची भूमिका घेतल्याने या रस्त्याचे भवितव्य काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. लॉकडाऊननंतर आणि पावसाळ्याच्या तोंडावर या कामाला सुरुवात झाली. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पावसात काम सुरू होते.
यावेळी फत्यापूर, कामेरी येथील लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी या कामास विरोध केला होता; परंतु गेले अनेक दिवस या खड्डेमय रस्त्याने जाताना वैतागलेल्या जनतेने आता या कामास विरोध नको म्हणून नरमाईची भूमिका घेतली आहे. लोकांच्या सोयीसाठी चांगला रस्ता होणे आवश्यक असून भर पावसात होणारे डांबरीकरण टिकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते कामाला सुरूवात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.