हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करत यंदाच्या मोसमात सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न भंग झाले. भारताच्या महिला संघाला उपांत्य फेरीत यजमान चीनकडून 4-0 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. आता त्यांना ब्रॉंझपदकासाठी पुढील सामन्यात खेळण्याची संधी आहे.
या पराभवामुळे महिला हॉकी संघाचे सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याचे स्वप्न भंग झाले. यापूर्वी 2018 साली जकार्ताला झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठूनही त्यांना जपान विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. भारतीय महिला हॉकी संघाने 1982 पासून या स्पर्धेत एकदाही सुवर्णपदक मिळवलेले नाही.
गुरुवारी झालेल्या उपांत्य लढतीत चीनकडून पहिला गोल जियाकी झोंग जियाकीने तर दुसरा गोल झोऊ मेइरोंगने केला. तिसरा गोल लियांग मेयूने तर चौथा गोल गु बिंगफेंगने केला. आता भारतीय संघ ब्रॉंझपदकासाठी खेळणार आहे. येत्या शनिवारी हा सामना होणार आहे.
Update: Women’s Hockey 🏑 at #AsianGames2022
Our girls lost to Team 🇨🇳 0-4 in the SF!
Next Stop: #Bronze🥉 Medal match on 7⃣th Oct!
All the best girls! Keep fighting hard💪🏻#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/9ry30J5rfI
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला संघाने ब्रॉंझपदक मिळवले होते. महिला हॉकीत भारताचा हा चीन विरुद्धचा 10 वा पराभव ठरला. यंदाच्या स्पर्धेत महिला संघाची वाटचाल स्वप्नवत झाली होती. पहिल्या सामन्यात सिंगापूरचा 13-0, नंतर मलेशिया विरुद्ध 6-0 असा विजय मिळवला होता. दक्षिण कोरिया विरुद्धचा तिसरा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. यानंतर हॉंगकॉंगवर 13-0 असा मोठा विजय मिळवला. भारतीय महिला संघाने गट फेरीत 33 गोल केले होते. त्यांच्या विरुद्ध एकच गोल नोंदला गेला होता. हेच सातत्य त्यांना उपांत्य फेरीत मात्र राखता आले नाही.