पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
मात्र, नेपाळविरुद्धच्या सलामीच्या लढतीत दुखापतीमुळे मैदान सोडावे लागलेला पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदीची दुखापत भारतीय संघाच्या पथ्यावर पडणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठीकाण – पाल्लेकेले, श्रीलंका
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
गेल्या काही काळात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे जीतके सामने विविध स्पर्धांमध्ये झाले त्यात शाहीनची गोलंदाजीच भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे.त्यामुळे या लढतीत तो खेळला नाही तर भारतीय फलंदाजांना दिलासा मिळेल मात्र, जर खेळला तर त्याच्या गोलंदाजीला योग्य उत्तर देण्यासाठी भारतीय फलंदाजांना अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे.
तसे पाहायला गेले तर दोन्ही संघांची ताकद समसमान आहे. जीतके दीग्गज फलंदाज दोन्ही संघांकडे आहेत तीतकेच भेदक गोलंदाजही दोन्ही संघांच्या ताफ्यात आहेत. त्यामुळेच हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानने या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत नेपळविरुद्ध 342 धावांचा डोंगर उभारला होता, त्यामुळे काही समिक्षक भारतीय संघाला सावधानतेचा इशारा देत आहेत मात्र, पाकिस्तानचा संघ जागतिक क्रिकेटमधील सर्वात बेभरवशाचा संघ मानला जातो त्यामुळे एका सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणारा हाच संघ दीडशतकी धावांच्या आतही गारद होताना अनेकदा पाहिले गेले आहे.
लक्षवेधी…
– स्पर्धेचा इतिहास भारताच्या बाजूने
– आजवर या दोन संघात 13 सामने
– भारताचे सात, पाकचे 5 विजय
– एक सामना पावसामुळे रद्द
– त्रयस्थ ठीकाणी या दोन संघात 75 सामने
– भारताचे 33 तर पाकचे 40 विजय
– दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही
– प्रमुख वेगवान गोलंदाज बुमराह ठरणार निर्णायक
– टी-20 पाठोपाठ त्याचे एकदिवसीय संघात पुनरागमन
– भारताचे सर्व प्रमुख खेळाडू संघात परतले
भारताचे वेगवान त्रिकुट जसप्रीत बुमराह, महंमद शमी व महंमद सिराज यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, महंमद रिझवान, फखर झमान, इफ्तेखार अहमद, इमाम उल हक यांना रोखले तर भारताचा विजय सुकर होणार आहे. मात्र, या स्थितीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, नवोदित तिलक वर्मा, अष्टपैलु हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांना पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे लागणार आहे.
भारतीय संघ मोठ्या स्पर्धांमध्ये आजवर पाकिस्तानकडून यापूर्वी झालेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा वगळता कधीही पराभूत झालेला नाही. त्यामुळे इतिहास भारतीय संघाच्या बाजूने आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरून सातत्याने बोलले जात आहे. त्यातच चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या लढतीसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा इशान किशनसह डावाची सुरुवात करेल.
तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीला आला तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यानंतर सूर्यकुमार यादव पाचव्या, हार्दीक पंड्या सहाव्या तर रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतील असा अंदाज आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व संघाचे थिंकटॅंक काय निर्णय घेतात यावर फलंदाजीचा क्रम अवलंबून राहणार आहे.
इशानचे स्थान कायम राहणार का…
या सामन्यासाठी अंतिम संघ निवडताना संघ व्यवस्थापन व कर्णधार रोहित शर्मा लोकेश राहुलला पसंती देणार का इशान किशनचे सातत्य पाहून त्याचे स्थान कायम राखणार हे पाहणे महत्वाचे आहे. खरेतर या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी राहुल पहिले दोन सामने खेळेल किंवा नाही याबाबत संदीग्ध उत्तर दिले होते. यातूनच तो अद्याप मॅचफिट नसल्याचेच समोर येत असल्याने इशान किशनचे संघातील स्थान कायम राहील अशीच शक्यता आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास?
या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेले दोन दिवस येथे वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचाच होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामना किमान 20 षटकांचा खेळवण्यात यश आले तर निकाल हाती येणार आहे. मात्र, ते देखील शक्य झाले नाही व सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. अशा स्थितीत सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव केलेला पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल मात्र, भारतीय संघाला पात्र होण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.
मला अहंकार नाही – शमी
जसप्रीत बुमराह संघात परतल्याने त्याच्यासह नवा चेंडू कोण वापरणार अशी चर्चा सुरु असतानाच अनुभवी गोलंदाज महंमद शमीने आपल्याला अहंकार नसल्याचे म्हटले आहे. सध्या महंमद सिराज नवा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळत असल्याने तोच बुमराहसह सुरुवात करेल असे संकेत रोहित शर्माने दिले होते. तसेच शमीच्या गोलंदाजीत रिव्हर्स स्विंग असल्याने त्याच्याकडे जूना चेंडू सोपवण्याची रणनिती भारतीय संघ वापरु शकतो. मला जेव्हा कर्णधार चेंडू सोपवेल त्यावेळी सरस कामगिरी करायची हाच माझा हेतू राहील व त्यात मला कोणताही कमीपणा जाणवणार नाही, असे शमीने म्हटले आहे.