भारत व पाकिस्तान (#INDvPAK) यांच्यात आशिया करंडक स्पर्धेत होत असलेल्या लढतीला हायव्होल्टेज ड्रामा किंवा जगातील सर्वात रंगतदार लढत असे वर्णिले जात आहे. एकूणच ही स्पर्धा व त्यातील सहभागी संघ यांचे काहीही महत्व अधोरेखित नसून केवळ याच लढतीसाठी माध्यमे, आजी माजी खेळाडू तसेच समालोचकांसह चाहतेही आकाश पाताळ एक करत आहेत.
मुळातच क्रिकेटच्या खेळातील हे दोन संघ आमनेसामने येत असताना त्याचा इतका गाजावाजा कशासाठी. हा खेळ आहे की युद्ध असाच प्रश्न निर्माण होत आहे. माध्यमांना चोवीस तास चघळण्यासाठी हे नवे च्युइंगगम उपलब्ध झाले आहे इतकेच.
कधीही टीव्ही सुरु केला की त्यातही याच लढतीबाबतच्या जाहीरातींनी अक्षरशः डोके पिकवले आहे. भारत व पाकिस्तान हे एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातच या संघात दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे द्विपक्षीय सामने तसेच मालिका होत नाहीत. त्यामुळे कधीतरी आयसीसी किंवा आशिया करंडक स्पर्धेतच हे दोन संघ एकमेकांशी खेळतात, त्याचा उत्साह जरूर असावा पण हायव्होल्टेज ड्रामा वगैरे विशेषणे वापरली जातात तेव्हा आपण खरेच क्रिकेटप्रेमी आहोत का हा प्रश्न पडतो.
एका स्पर्धेतील अन्य सामन्यांप्रमाणेच याही सामन्याला तीतकेच महत्व दिले गेले पाहीजे. भारताकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानमध्ये घरातील टीव्हीही फोडणारे महाभाग आहेत किंवा भारतीय संघ पराभूत झाल्यावर सोशल मीडियावर आपले ज्ञान पाजळणारे भारतीय महाभागही आहेतच.
हा खेळ आहे व त्यात विजय आणि पराभव होणारच हे गृहित धरुन सामने पाहीले गेले पाहीजेत. गेल्या काही वर्षांत या दोन्ही संघातील खेळाडूंमध्येही मैत्रीचे नाते फुलले आहे. विराट कोहलीचे जीतके चाहते भारतात आहेत तसेच पाकिस्तानमध्येही आहेत. जावेद मियांदाद की सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर की इंझमाम उल हक किंवा आता बाबर आझम की विराट कोहली अशी स्पर्धा माध्यमे व चाहते रंगवतात तेव्हा हसु येते.
समकालिन असले तरीही यातील कोणत्याही खेळाडूंची एकमेकांशी स्पर्धाच होऊ शकत नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. एका सर्वसामान्य सामन्याप्रमाणेच हा सामनाही खेळला जावा व विजय कोणत्याही संघाने मिळवावा मात्र, खेळाचा आनंद पुरेपुर मिळावा इतकीच अपेक्षा केली तर काही चुकणार आहे का. अनावश्यक गोष्टींना इतके महत्व कशासाठी.