कोलंबो :- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह बीसीसीआयच्या अ प्लस श्रेणीतील खेळाडू आशिया करंडक स्पर्धेमुळे मालामाल बनले आहेत.
ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंकेत संयुक्तपणे होत असली तरीही त्यातून अन्य कोणत्याही देशाच्या खेळाडूंपेक्षा भारतीय क्रिकेटपटूच श्रीमंत होत आहेत.
भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन दिले जाते. सध्या भारतीय संघात 4 श्रेणी आहेत. अ प्लस, अ, ब आणि क अशा चार श्रेणीनुसार मानधन दिले जाते. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जमप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हे अ प्लस श्रेणीत आहेत.
हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्चिन, महंमद शमी, ऋषभ पंत आणि अक्सर पटेल अ श्रेणीत आहेत. ब श्रेणीत चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, महंमद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.
क श्रेणीत उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि श्रीकर भरत आहेत.
या खेळाडूंचा एक वर्षाचा करार येत्या 23 सप्टेंबर रोजी संपणार आहे. अ प्लससाठी वर्षाला 7 कोटी, अ श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, ब श्रेणीसाठी 3 कोटी तर, क श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये करारानुसार दिले जातात. त्याच बरोबर या सर्व खेळाडूंना प्रत्येक सामना खेळण्यासाठी वेगळे मानधनही दिले जाते.
कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 साठी भिन्न मानधन दिले जाते.
खेळाडू कोणत्याही श्रेणीत असला तरी त्याला प्रत्येक सामन्यात समान वेतन मिळते. या खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख तर टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मानधन दिले जाते.
आशिया करंडकाद्वारे लखपती..
या स्पर्धेत कोणता संघ किती सामने खेळतो आणि ते सामने कोणते खेळाडू खेळतात यावर या स्पर्धेतील खेळाडूंची कमाई अवलंबून आहे. जर एखादा खेळाडू कोणत्याही सामन्यात नसेल तर त्याला त्या सामन्याचे मानधन मिळत नाही. भारताला किमान 5 सामने खेळायचे आहेत. जर एखाद्या खेळाडूने हे पाचही सामने खेळले तर त्याला या स्पर्धेतून किमान 30 लाख रुपये मिळतील. आता भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले असल्याने ही रक्कम 42 लाख रुपयांपर्यंत जाईल.