मुंबई :- आशिया करंडक स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी व उपाध्यक्ष राजीव शुक्ला सोमवारी पाकिस्तानला रवाना झाले. यावरून उलट सुलट चर्चा होत असताना बिन्नी यांनी ही भेट केवळ आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने असून त्याला कोणताही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, असा खुलासा केला आहे.
बिन्नी आणि शुक्ला हे दोघेही अटारी-वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानला रवाना झाले. मंगळवारी त्यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान उपस्थित राहून पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सदस्यांशीही चर्चा केली.
दोन दिवसांचा हा दौरा राजकीय नसून केवळ क्रिकेटबाबतचाच आहे. यादरम्यान एका डिनरचेही आयोजन करण्यात आले असून त्यात भारत व पाकिस्तानसह अफगाणिस्तान, श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या सदस्यांचाही समावेश आहे.
बिन्नी 2006 नंतर प्रथमच पाकिस्तानला गेले आहेत. भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करत नाही तसेच भविष्यात दौरा होऊ शकतो का याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल व तो आम्हाला मान्यही असेल, असे बिन्नी यांनी म्हटले आहे. बिन्नी आणि शुक्ला गुरुवारपर्यंत पाकमध्येच असणार असून त्यात केवळ क्रिकेटबाबतच चर्चा होणार आहे.