जामखेड – शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, जामखेड नगरपरिषदेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही उघड्या भांड्यात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू, चिकुनगुन्यासदृश आजारांना आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अनेक जणांना तापाची साथ जाणवत आहे. मात्र, बहुतांश नागरिक ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. शहरामध्ये नगरपरिषदेकडून औषध फवारणी केली जात नाही. तसेच रोगराई निर्मूलन करण्यासाठी किंवा डासाची उत्पत्ती कमी होण्यासाठी नगरपरिषद अपेक्षित प्रयत्न करीत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
सध्याची एकूण परिस्थिती पाहता डोकेझाकपणे कामकाज सुरू असून, आजारांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. याकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. शहरात नगरपरिषदेकडून कचरा उचलण्याचे काम चोखपणे केले जात असले, तरीही नगरपरिषदेने ज्या ठिकाणी गटारात सांडपाणी तुंबते किंवा पावसाचे पाणी तुंबते, अशा ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता आहे. पावसाचे पाणी साठून राहते अशा खराब वस्तू नष्ट करणे आवश्यक असून, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.