शिरूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद
सणसवाडी – अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल आहे आणि मुख्यमंत्री उत्सवात फिरत आनंदोत्सव साजरा करत आहेत. लोकांना सध्याचे सरकारमध्ये कृषीमंत्री कोण? हेही माहीत नाहीत आणि जे कुणी अब्दुल सत्तार म्हणून मंत्री आहेत त्यांना शेतीतले काही कळत नाही, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.
शिरूर तालुक्यातील मलठण, वाघाळे, गणेगाव आदी गावांचे पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी राज्यमंत्री सचिन आहेर, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, तालुका प्रमुख राजाराम बाणखेले, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, जिल्हा संघटक अविनाश रहाणे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम बाणखेले यांनी अतिवृष्टीमुळे शेतकरी भुकेकंगाल झाल्याने व्यापारीवर्गही धंदा न झाल्याने तोट्यात आहे. करोनो काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षे परिस्थिती संयमाने हाताळली नसती तर हे गद्दार खोके खायला जिवंतच नसते, असे सांगितले. यावेळी मलठण, टाकळी हाजी, पिंपरी दुमाला गावचे शेतकऱ्यांनी निवेदने दिली.
“शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये’
रांजणगाव गणपती -शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला मी आज या ठिकाणी आलो आहे. पंचनामे होऊन राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी धीर खचू न देता स्वतःच्या जीवाचे बर-वाईट करुन घेऊ नका, असे आवाहन राज्याचे माजी पर्यटन मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे आले असता मलठण, वाघाळे, वरुडे या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी रस्त्याच्या कडेला, गाडीजवळ असलेल्या जमावाशी संवाद साधण्यासाठी थेट रस्त्यावरच बसणे पसंत केले. सुमारे दहा ते पंधरा मिनिट ते शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देत होते. शेतकऱ्यांची व ग्रामपंचायतींनी दिलेली निवेदने ते स्विकारत होते.