पुणे – मागील काही दशकांत लोकसभा निवडणुका भर उन्हाळ्यात होत आहेत. यंदा वाढती तीव्रता लक्षात घेता मतदारांसाठी विशेष सुविधा मतदान केंद्रांवर असणार आहेत. पण, त्यासोबतच निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे उन्हापासून रक्षण आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) पुणे यापूर्वीच प्रशासनास काही सूचना केल्या आहेत.
दरम्यान, मार्चमध्येच घामाच्या धारा वाहू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. तर, एप्रिल आणि मेमध्ये आणखी उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी बऱ्याच सुधारणा करण्यास स्थानिक प्रशासनांना सुचवले आहे.
त्यात मतदान केंद्रांवर पंखा-कूलर लावणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, मतदान केंद्राचा परिसर थंड राहील यासाठी मंडप उभारणे किंवा आच्छादन टाकणे, आपत्कालीन परिस्थिती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अशा बाबींचा त्यात समावेश आहे.
पण, हे सर्व मतदारांच्या दृष्टीने नियोजन आहे. उकाडा वाढत्या उन्हाच्या दृष्टीने मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देखील प्रशासनाला नियोजन करावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी “आयआयटीएम’ने याबाबत सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार मतदान अधिकाऱ्यांना सुती कपडे असलेला पोशाख वापरण्यास सांगणे, सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे, उन्हापासून बचाव करण्यासाठी आहार आणि पुरेसे पाणी उपलब्ध करणे, कूलिंग सेंटर्स आणि आरोग्य सुविधा उभारण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
“उष्णतेच्या लाटांवरील राष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) कडे सादरीकरण केले आहे. आगामी निवडणूक कालावधीत तापमानाची संभाव्यता त्यात व्यक्त केली आहे. उष्णतेच्या लाटेचा अंदाज असलेल्या भागात मतदानाची वेळ वाढवणे हा एक पर्याय असू शकतो.” – डॉ. रॉक्सी कोल, शास्त्रज्ञ
याचे नियोजन आवश्यक
– प्रचार सभा आणि रॅलीचे नियोजन करताना तापमानाची स्थिती लक्षात घ्यावी.
– हवामानशास्त्र विभाग उष्णतेच्या लाटेचा अंदाज प्रसारित करेल, त्यानुसार काळजी घ्यावी
– लांब रांगेत उभे असलेल्या मतदारांना सावली, पाणी आणि शौचालये उपलब्ध करावीत