- दुकाने सुरू झाल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी
- सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा मात्र उडाला फज्जा
पिंपरी – राज्य सरकारने लॉकडाऊन 15 तारखेपर्यंत वाढविला असला तरीही स्थानिक पातळीवर करोनाबाबतची परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारपासून (दि. 1) मॉल्समधील दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने दीड महिन्यानंतर सुरू झाली. निर्बंध शिथिल होताच सोमवारी रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पहावयास मिळाली. जणू काही शहर पूर्णपणे करोनामुक्त झाले असल्याप्रमाणे सर्वत्र नागरिकांचा मुक्त वावर होता.
दुकाने सुरू होताच नागरिकांनी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांकडे मात्र नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सध्या विविध जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पॉझिटिव्हिटी रेट विचारात घेऊन महापालिका स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील करोनाबाधितांची घटती संख्या आणि कमी होत असलेला पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन शहरातील मॉल्समधील दुकाने वगळता अन्य दुकाने सुरू करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली. सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत ही दुकाने खुली राहणार आहे. अत्यावश्यक वस्तू विक्री दुकाने, कृषी संबंधित दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील. तर, अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे.
दुकाने सुरू झाल्यानंतर नागरिकांनी आज विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, पिंपळे सौदागर आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मोबाइल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, सराफा बाजार, कापड बाजार आदी दुकानांमध्ये विशेष गर्दी पाहण्यास मिळाली. कडक निर्बंधांमध्ये देखील काही दुकानदारांनी “शटर बंद, दुकान सुरू’ असा छुप्या पद्धतीने व्यवसाय केला. मात्र, आता अधिकृत परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी बाजारपेठेत मोबाइल दुरूस्ती, मोबाइलचे विविध सुट्टे भाग तसेच मोबाईल खरेदी करण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांवर नागरिकांना खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी केली होती.