मुंबई – करोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.
करोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री, ऍड. परब यांनी केली. त्याशिवाय करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या एसटीचा मंगळवारी, 1 जून 2021 रोजी 73 वा वर्धापनदिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले करोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती.
या योजनेची मुदत 30 डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर 30 जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत मंत्री, ऍड. परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील 30 जून 2021 पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, करोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रूपयांची मदत देण्याचे ऍड. परब यांनी जाहीर केले.
करोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात ऍड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी
करोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा करोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परब यांनी दिले.