Jammu-Kashmir : सरत्या वर्षात (२०२३) काश्मीरला सुमारे २ कोटी पर्यटकांनी भेट दिली. त्यातून काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा स्थितीत सुधारणा झाल्याचे सूचित होते, अशी भूमिका केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडली. जम्मू-काश्मीरमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला.
त्या हल्ल्यात लष्कराचे ५ जवान शहीद झाले. त्या घटनेवरून पत्रकारांनी सिंह यांना सुरक्षा स्थितीविषयीचा प्रश्न विचारला. उत्तरादाखल ते म्हणाले, तशा घटनांकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत.
सुरक्षा स्थिती खालावल्याचे म्हणणे योग्य नाही. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप काही सांगणारी आहे. एखादे ठिकाण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच पर्यटक भेट देतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा आणि एकूणच स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा सातत्याने मोदी सरकारकडून केला जातो. त्याचाच पुनरूच्चार करत सिंह यांनी पर्यटनाला आलेल्या बहराचा आधार घेतला.