नवी दिल्ली/टोकीओ : देशातील नव्या नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ आसाममध्ये सुरू असलेल्या हिंसाचामुळे जपानचे पंतप्रधान शिंजे ऍबे यांनी आपला भारत दौरा पुढे ढकलला आहे. ऍबे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषद या आठवड्याच्या अखेरीस गुवाहाटी येथे होणार होती.
जपानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा दोन्ही बाजूने सामंजस्याने पुढे ढकलण्यात आला आहे. भेटीच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येतील असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. काही दैनिकांनी या शिखर परिषदेवर अनिश्चिततेचे सावट असल्याचे भाकीत यापुर्वीच केले होते.
नव्या नागरिकत्व विधेयकाला संसदेत मंजूरी मिळताच असाम आणि ईशान्य भारतात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे शंभर निदर्शक या आंदोलानाच्या काळात जखमी झाले आहेत. या आंदोलनाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
ऍबे यांच्या आगमनापुर्वी या परिषदेला अंतिम रूप देण्यासाठी जपानचे पथक येतील हॉटेलमध्ये उतरले असतानाच आंदोलानाला सुरवात झाली. ऍबे यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले फलकही आंदोलकांनी पेटवून दिले. त्यामुळे स्थानिक परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जपानच्या मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव योशिहिडे सुगा यांनी म्हटले असल्याचे ब्लूमबर्गच्या बातमीत म्हटले आहे.
गुवाहाटी येथून चर्चेचे स्थळ हालवल्यास ऍबे यांच्या सोबत येणाऱ्या अवाढव्य शिष्टमंडळाची सोय दिल्लीच्या हॉटेलांमध्ये करणे शक्य होणार नसल्याचे दोन्ही बाजूंच्या वतीने मान्य करण्यात आले. 15 ते 17 डिसेंबर या काळात मोदी-ऍबे यांच्यात शिखर परिषद होणार होती.