कुणी घर देता का रे..?..घर?; ज्येष्ठांच्या नशीबी वृद्धाश्रमाची वाट
– दीपेश सुराणा
पिंपरी : “रातंदिन कष्ट करून शिकविलं किती..
म्हातारपणी सोडून दिलं, कुठे गेली प्रीती?
नातवंडांशी रं खेळण्याची झाली आता चोरी
नशीबानं काय थट्टा मांडली रं हरी…”
कमावती मुलं जेव्हा आई-वडीलांना विसरतात. त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. तेव्हा कवितेच्या या ओळी शब्दश: खऱ्या वाटू लागतात. किवळे येथील “स्नेहसावली – आपलं घर’ येथील वृद्धाश्रमात कुटूंबाशी ताटातूट झालेल्या ज्येष्ठांच्या व्यथा ऐकताना मन सुन्न झालं आणि वि.वा. शिरवाडकर लिखित “नटसम्राट’ नाटकातील संवाद राहून राहून आठवू लागले. कुणी घर देता का रे..? घर..?
शकुंतला नाईक. वय वर्ष – 76. दोन्ही मुलं कमावती. शकुंतला या मुळ कुडाळच्या. मोठा मुलगा बी.एस्सी. झालेला. मुंबईतील कंपनीत कामाला जातो. पुण्यात राहायला आहे. छोटा मुलगा चार्टर्ड अकाऊंटंट. एक मुलगी आहे अभियंता झालेली. पण आईला सांभाळत कोणीच नाही. शकुंतला या पुण्यात मोठ्या मुलाकडे राहण्यासाठी होत्या. त्यांना मधुमेहाचा आजार आहे. आईचे आजारपण सारखे वाढल्याने आईला “स्नेहसावली’ वृद्धाश्रमात सोडून दिले. गेल्या सहा महिन्यांपासून त्या येथे आहेत. मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि म्हातारपणात मुलांना जबाबदारीची जाणीव राहिली नाही. आईला दु:ख वाटते पण सांगणार कोणाला? ओठांतून शब्द बाहेर पडत नाही आणि डोळ्यांतील आसवंही थिजून गेलेली आहेत.
नंदा कुंभार यांची व्यथा काही वेगळी नाही. वय वर्ष 67. सोलापूर जिल्ह्यातील रोपळं हे मूळ गाव. माणमध्ये धाकट्या मुलाकडे राहत होत्या. मुलगा ट्रक ड्रायव्हर. मोठा मुलगा वीटभट्टी कामगार. शिरवली (बारामती जवळ) येथे राहतो. धाकट्याने सोडले नाही पण सून म्हणाली तुम्ही मोठ्या मुलाकडे राहण्यासाठी जा किंवा घरधन्याकडे. नंदा यांचे पती गावाकडे राहतात. गावाकडे चार एकर शेतजमिन. पण बायकोला राहू देत नाही. मोठा मुलगा घरजावई. त्याच्याकडे कसे राहायचे म्हणून आई नंदा या गेल्या दोन वर्षांपासून “स्नेहसावली’मध्येच राहत आहेत.
निवृत्ती मराळे (वय – 84) यांची कथा तर वेगळीच आहे. त्यांनी लग्नच केलेले नाही. ते मूळचे कांजळीगाव (नारायणगाव जवळ) येथील आहेत. आयुष्यभर देव देव करीत फिरले. चार धामाची यात्रा केली. लोकांनी दिलेल्या माधुकरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालला. आता आयुष्याच्या सायंकाळी स्नेहसावलीत त्यांना विसावा मिळाला आहे.
…आणि त्यांना मिळालं “आपलं घर’
“स्नेहसावली’ हे ज्येष्ठांसाठी आता खऱ्या अर्थाने “आपलं घर’ झालं आहे. येथे सध्या 11 ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी शंकर महाराज सेवा मंडळाने (चिंचवड) हे वृद्धाश्रम सुरू केले. पॅथॉलॉजिस्ट डॉ. अविनाश वैद्य आणि डॉ. मनाली वैद्य हे त्याची जबाबदारी सांभाळत आहेत. ज्येष्ठांसाठी येथे मोफत निवास, जेवण-नाश्ता आणि वैद्यकिय सेवा अशी सुविधा दिलेली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणगीवर वृद्धाश्रम सुरू आहे. त्याशिवाय, वर्तमानपत्राची रद्दी आणि घरातील भंगार वस्तू नागरिक विनामूल्य आणुन देतात. त्यांची विक्री करून जमणारा निधी वृद्धाश्रमासाठी वापरला जातो. तसेच, गणेशोत्सवात इको-फ्रेंडली गणेशमूर्ती विकूनही निधी उभारला जातो.