नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाची दिल्ली महापालिकेत ( Delhi MCD Election 2022 ) पंधरा वर्ष सत्ता आहे. त्यांनी दिल्लीत सगळीकडे कचऱ्याचे डोंगर उभे केले आहेत. आणि आता जर पुन्हा भाजपला येथे सत्ता दिली तर ते दिल्लीचा नरक करून टाकतील अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पहाडगंज येथील एका प्रचार सभेत बोलताना केली.
ते म्हणाले की दिल्लीतील शाळा, रूग्णालये ठीक करण्याचे काम आमच्याकडे होते ते काम आम्ही करून दाखवले आहे. आम्ही वीज, पाणी, मोफत केले आहे. महिलांना बस मोफत केली आहे. आता दिल्लीतील कचरा साफ करण्याची सर्वाधिक गरज असून महापालिकेत आमची सत्ता आली तर दिल्ली आम्ही स्वच्छ करून दाखवू.
कचरा साफ करणे हे महापालिकेचे प्राथमिक काम आहे ते कामही त्यांना जमले नाही. गेल्या पंधरा वर्षात भाजपने महापालिका स्तरावर केलेले एखादे तरी चांगले काम सांगता येईल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. दिल्ली आपली आहे, ती नीट करावीच लागेल त्यासाठी आम आदमी पक्षाला मतदान करण्याच आवाहन त्यांनी केले.
दिल्लीकरांना मोफत वीज देणे म्हणजे त्यांना रेवडी वाटप करण्यासारखे आहे अशी टीका मोदींनी केली होती. त्याचाहीं जोरदार समाचार केजरीवालांनी घेतला. ते म्हणाले की, जो पर्यंत केजरीवाल येथे आहे तो पर्यंत दिल्लीच्या नागरीकांची मोफत वीज आणि पाण्याची सोय कोणीही काढून घेऊ शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.