विधानसभा निवडणुकांत भाजपचा राहणार राष्ट्रीय मुद्द्यांवर भर
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रचाराचे स्वरूप निश्चित केले आहे. त्यानुसार, पक्षाकडून प्रामुख्याने कलम 370, मोदी सरकारची भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाची (एनआरसी) देशव्यापी अंमलबजावणी आदी राष्ट्रीय मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दोन्ही राज्यांची सत्ता राखण्याबाबत पूर्ण खात्री वाटत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी प्रामाणिक आणि सक्षम सरकारे दिल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटते. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर भर देऊन आगामी दिल्ली आणि झारखंड विधानसभा निवडणुकांतील प्रचाराची रणनीती आताच घोटवून घेण्याचे भाजपने ठरवल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी मोदी सरकारने कलम 370 हटवले. त्या पाऊलाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक असल्याचे भाजपला वाटते. भ्रष्टाचारावरून बड्या नावांवर झालेल्या कारवाईकडे जनता अनुकूलतेने पाहत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्या मुद्द्यांवरून विरोधकांना आणि विशेषत: कॉंग्रेसला बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागत असल्याचा दावा त्या सुत्रांनी केला.
विधानसभा निवडणुकांत प्रचाराची धुमाळी उडवून देण्यासाठी मोदी आणि शहा सज्ज झाले आहेत. मोदी हरियाणात 4 ते 5 तर महाराष्ट्रात सुमारे 10 सभा घेतील. शहा यांच्या सभांची संख्या मोदींपेक्षा दुप्पट असण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या गरजेनुसार मोदी आणि शहांच्या सभांची संख्या बदलू शकते, असेही भाजपच्या सुत्रांनी नमूद केले.