पुणे – लष्कर भरती प्रकरणात आठ जणांचा जामीन विशेष न्यायाधीश एस.बे.हेडाऊ यांनी फेटाळला. त्यामध्ये दोन मेजर आणि ऍकडमी चालकांचा समावेश आहे. दरम्यान केस स्वत:कडे घेण्यस लष्कराने असमर्थता दर्शवली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी दिली आहे.
लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात लष्करातील कर्मचारी, दोन मेजर आणि एका लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी गुंतलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण कोर्ट मार्शलद्वारे चालविण्यात यावे यासाठी सरकार पक्षातर्फे कायदेशीर तरतुदींच्या आधारे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तो मंजूर होऊन तसे पत्र न्यायालयाने दक्षिण कमांड मुख्यालयास पाठविले होते. मात्र, त्यांनी चालविण्यास असर्थता दर्शवाल्याचे यावेळी संगण्यात आले.
मेजर किशोर महादेव गिरी (वय 40, रा. बारामती), माधव शेषराव गिते (वय 39 , सॅपिअर विहान कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय 31, रा. दिघी कॅम्प), उदय दत्तू औटी (वय 23, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय 37, रा. जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय 47, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू), वसंत विजय किलारी (वय 47), विरा प्रसाद कोटीस्वामी नारगेपाटी (वय 45, दोघेही रा. आंध्रप्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लष्कर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ऍकडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.