मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांना जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा फटका बसला होता. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली होती.
या पुरात सर्वसामान्य नागरिकांसह शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसान भरपाईसाठी पंचनामेही करण्यात आले आहेत. आता राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019 सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अतिवृष्टीबाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसान भरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम 2019 सालच्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. यामुळे अतिवृष्टीबाधितांनी समाधान व्यक्त केले आहे.