नवी दिल्ली – दिल्लीच्या सिंघू सीमेवर तरणतारण येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला तातडीने सोनिपत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने रोहटक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे दाखल करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करणारी चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे, शिख धर्मगुरू बाबा राम सिंग यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच भागातील आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
15 सप्टेंबरला हे आंदोलन सुरू झाल्यापासून पंजाब आणि दिल्लीत आंदोलनात सहभागी झालेल्या 41 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 30 शेतकरी हे माल्वा पट्ट्यातील आहेत. सहा दोअबा पट्ट्यातील आहेत. दोन माझा पट्ट्यातील तर पाच जण हरियाणातील आहेत.
दिल्ली मोर्चात अथवा दिल्लीतून परतताना किती जणांचा मृत्यू झाला, याची नेमकी यादी उपलब्ध नाही. मात्र, असे सांगण्यात येत आहे की 26 नोव्हेंबरनंतर यातील 26 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. आठ ऑक्टोबरला तेज कौर या महिलेचा रेल्वे ट्रॅकवर पडल्यामुळे मृत्यू झाला होता. गुरमेल कौर यांचा हृदयविकाराने भटींडा येथे निदर्शनातच मृत्यू झाला होता.