नाशिक – फटाके फोडण्यावरून व पूर्वीच्या वादातून मित्रांनीच युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवार (दि. 14) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाथर्डी गाव लगत स्वराज्य नगर येथे घडली आहे. कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौरव तुकाराम आखाडे (वय ३१) असे मृताचे नाव आहे. ऐन दिवाळी सणात खूनाची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डीगावालगत स्वराज्य नगर येथे रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्याच्यावर परिसरात राहणाऱ्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने सपासप वार केल्याने गौरव गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यृ झाला.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत गौरव याची पत्नी सपना आखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.