मुंबई – श्री रामजन्मभूमी अयोध्येत निर्माणाधीन दिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यातील जनतेला अभिषेक झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र भाजप ‘चलो अयोध्या अभियान’ राबवणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून भाजपकडून अयोध्येसाठी 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील जनतेला अयोध्येला घेऊन जाण्याची योजना पक्षाने आखली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रदेश कार्यालयात भाजप उत्तर भारतीय मोर्चाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करून बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकानंतर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी अयोध्येला नेण्याची तयारी करण्यात आली आहे. ‘चलो अयोध्या अभियान’ची विशेष जबाबदारी भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोणत्याही रामभक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या अभिषेकनंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून अयोध्येपर्यंत 36 ट्रेन धावणार आहेत. या गाड्यांमधून राज्यातील रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्र भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी खास सोपवण्यात आली आहे.