भोर -करोनाच्या काळात शहरी भागातून सुमारे 25 ते 30 हजार नागरिक आपआपल्या गावी भोरला आले. त्यानंतर काही गावांसह शहरातही करोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, तालुक्यासह शहर करोनामुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय सर्व घटकांसह नागरिकांनी केलेल्या उपाययोजना कौतुकास पात्र आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भोरवासियांची पाठ थोपटली आहे. पण आपला लढा अद्याप संपलेला नाही यापुढीही असेच सहकार्य पेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करोना आणि भोर तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी भोर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक राजू मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत सदस्य रोहन बाठे यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, अवकाळी पाऊस, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, भोर तालुक्यातील कोंढरी, तसेच मुळशी तालुक्यातील घोटके गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन, उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी मदत, शिवापूर टोलनाका, भोर-वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात खते, बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, शेतीसाठी आवश्यक असणारा युरिया खताचा तुटवडा दूर व्हावा, शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज मिळावे, तसेच या तीनही तालुक्यातील महावितरणचे प्रश्न मार्गी लावले जावेत, आदी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन जिल्हधिकारी राम यांनी दिले.
कोंढरीचे पुनर्वसन होणारच
मागील वर्षी अतिवृष्टीत भूस्खलन झालेल्या हिर्डोशी खोऱ्यातील कोंढरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न करोनाच्या संकटामुळे लांबला असला तरी हा प्रश्न मार्गी लावला जाणार असून ग्रामस्थांनी घाबरू जावू नये, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गावास प्रत्यक्ष भेट देऊन दिले आहे.
खेड शिवापूर टोलनाक्याबाबत आज बैठक
खेडशिवापूर टोलनाक्याबाबत गुरुवारी (दि. 25) संबंधित विभागाचे अधिकारी, टोलप्रशासन आणि टोल हटाव कृतीसमितीच्या पदधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत टोल प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेबाबत आणि स्थानिकांना टोलमाफी व रखडलेल्या पुणे-सातारा महामार्गाच्या कामाबाबत चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.