लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अंमलबजावणी संचनालय आणि पोलिसांमधील अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दाखल असून ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची अटकळ राजकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.
कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी काल व्हीआरएस अर्ज दाखल करत भाजपामध्ये प्रवेशाचे संकेत दिले. ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंग यांचा व्हीआरएस स्वीकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजेश्वर सिंह यांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हा अर्ज केला होता. राजेश्वर सिंह आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. मात्र, सिंह यांनी कोणतेही अद्याप भाष्य केले नाही. असीम अरुण हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेमध्ये तैनात होते आणि आयएसआयएस दहशतवादी सैफुल्लाच्या चकमकीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. तर राजेश्वर सिंह यांनी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत राहिले आहेत. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप होते.
राजेश्वर सिंह हे मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पाखरौली येथील आहे. त्यांनी बी.टेक.ची पदवी घेतली आहे. यासोबतच राजेश्वर सिंह यांनी पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयात पीएचडी केली आहे. 1996च्या बॅचचे पीपीएस अधिकारी असण्यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशात पोलीस अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
2009 मध्ये ते अंमलबजावणी संचालनालयात रुजू झाले. सहा वर्षांनंतर म्हणजेच 2015 मध्ये त्यांचा कायमस्वरूपी ईडीच्या कॅडरमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांना ईडी लखनऊ झोनचे सहसंचालकही करण्यात आले. ईडीमध्ये रुजू झाल्यानंतरच त्यांचे नाव हायप्रोफाईल प्रकरणांशी जोडले जात होते.सिंह हे गाझियाबादच्या साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुका जाहीर होताच कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी व्हीआरएस साठी अर्ज केला. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली आहे असे म्हटले.
फेसबुकवर पोस्ट शेअर करताना त्यांनी, आता मला नव्या पद्धतीने देश आणि समाजाची सेवा करायची आहे. योगी आदित्यनाथ यांनी मला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वासाठी योग्य मानले आहे, असे म्हटले आहे. तेव्हापासून अरुण विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु आहे.