भारतीय बॅडमिंटन संघाने बलाढ्य इंडोनेशियाचा पराभव करत मानाची समजली जात असलेली थॉमस करंडक स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली. हा केवळ एक विजय नव्हता, तर जागतिक बॅडमिंटनवर भारतीयांनी मक्तेदारी निर्माण केली, हे दाखवणारा विजय होता. या विजयाचे शिल्पकार प्रत्यक्ष कोर्टवर खेळणारे खेळाडूच असले तरीही त्यामागे अनेक वर्षांची मेहनत व जिद्दही होती.
भारताचा नवोदित स्टार लक्ष्य सेन याने गेल्या दोन मोसमांपासून जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत त्याच्या जोडीला किदाम्बी श्रीकांतसारखा अनुभवी खेळाडूही स्पर्धेत वर्चस्व राखताना दिसला, ही भविष्यातील भारतीय बॅडमिंटनच्या सत्तेची नांदी ठरली. एकेरीत जसे या दोघांनी आपली हुकूमत सिद्ध केली तशीच दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी आपणही काही कमी नसल्याचेच दाखवून दिले.
या स्पर्धेत भारतीय संघ जेव्हा सहभागी झाला तेव्हा हा संघ फार तर पहिल्या दोन फेरीत विजय मिळवेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आपल्याच खेळाडूंवर विश्वास नसल्याची ही लक्षणे आपण काही पहिल्यांदाच पाहात नव्हतो. केवळ बॅडमिंटनच नव्हे तर जागतिक स्तरावर कोणत्याही खेळात आपले खेळाडू सहभागी होतात, तेव्हा सोकॉल्ड जाणकार आपल्याच यशाबाबत साशंक असतात. अर्थात आता आपल्या खेळाडूंनाही या पोटार्थी टीकाकारांच्या लेखणीची सवय झाली आहे हा भाग वेगळा.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना इंडोनेशियाने एकही सामना गमावला नव्हता. त्यांनी चीन व जपानचा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली होती. भारताला मात्र, तैपेयीविरुद्धचा सामना गमवावा लागला होता; परंतु त्यानंतर भारताने मलेशिया व डेन्मार्कवर मात करत आपली कामगिरी उंचावली व इंडोनेशियाला इशारा देत अंतिम फेरी गाठली होती.
लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांतने एकेरीत तर सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने दुहेरीत अफलातून कामगिरी करत आपापले सामने जिंकले. या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेचे पहिलेच विजेतेपद साकार केले व सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने इंडोनेशियाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तब्बल 14 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या इंडोनेशियावर एकेरीच्या दोन तर दुहेरीच्या लढतीतही भारताने वर्चस्व राखले.
असे राखले वर्चस्व
एकेरीच्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या लक्ष्य सेन याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगवर 8-21, 21-17, 21-17 असा पराभव केला व देशाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा सामना तब्बल 1 तास 5 मिनिटे चालला. दुसऱ्या सामन्यात दुहेरी गटात भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या केविन संजय आणि महंमद एहसान यांचा 18-21, 23-21, 21-19 असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. दिवसातील अखेरच्या तिसऱ्या सामन्यात एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने जोनाथन क्रिस्टीवर 21-15, 23-21 अशी जिद्दीने मात केली व भारताला या स्पर्धेचे 3-0 अशा विजयासह विजेतेपद मिळवून दिले.
आता लक्ष्य पॅरिस
जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू हिने पदक पटकावले. त्यापूर्वी 2012 साली सायना नेहवालने पदकाला गवसणी घातली. मात्र, या दोघींव्यतिरिक्त भारताला त्या स्पर्धेत काहीही यश गवसले नाही. टोकियोत भारताच्या पुरुष खेळाडूंनाही अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता थॉमस करंडक स्पर्धेतील यशामुळे आपले पुरुष खेळाडू देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकतील, असा विश्वास वाटू लागला आहे. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत हे एकेरीत तर सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे दुहेरीत किमया घडवू शकतात. चीन, जपान, कोरिया, तैवान, मलेशिया व सर्वात बलाढ्य इंडोनेशिया यांची जागतिक बॅडमिंटनवरील मक्तेदारी भारतीय संघ निश्चितच मोडून काढू शकतो. थॉमस स्पर्धेत भारतीय संघाने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता पुढील दोन ते अडीच वर्षे लक्ष्य सेनसह सर्वच खेळाडूंचा मुख्य उद्देश पॅरिस ऑलिम्पिकचे पदक हाच असला पाहिजे.
ऑल इंग्लंडही आहेच
जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात ऑलिम्पिकच्याच बरोबरीने प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा. भारताच्या प्रकाश पदुकोन व पुलेला गोपीचंद यांनाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. भारताचा नवोदित स्टार लक्ष्य सेन याने यंदाच्या स्पर्धेत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, विजेतेपदापासून त्याला दूर राहावे लागले होते. जगभरात असे सांगितले जाते की, जर तुम्ही बॅडमिंटनपटू म्हणून सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न उराशी बाळून असाल, तर तुम्हाला एकवेळ एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकता आली नाही तरी चालेल मात्र, ऑल इंग्लंड जिंकण्यासाठी जीवाचे रान करा. आता हेच आपल्या खेळाडूंनीही ध्यानात घेत पॅरिस पाठोपाठ या स्पर्धेबाबतही गांभीर्य राखले तरच ते पूर्ण होईल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुळात ते पाहावे लागते, त्याचा पाठलाग करावा लागतो व त्यासाठी कॅज्युअल ऍप्रेचच्या अहंकारातून आधी जागे व्हावे लागते. थॉमस करंडक ही यशाची पहिली पायरी समजावी तरच पॅरिस व ऑल इंग्लंडचे शिखर सर करता येईल.
अमित डोंगरे