“वरिष्ठ सभागृह’ मानल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. यातील 31 जागा रालोआकडे असून त्यातील 25 जागा सध्या भाजपाकडे आहेत. तथापि यंदा या सर्व जागा राखून आपला गड शाबूत ठेवणे ही एनडीएसाठी कसोटी असणार आहे. दुसरीकडे यूपीएकडे 13 जागा असून यंदा यामध्ये 2 ते 4 जागांची वाढ होईल, असा निरीक्षकांचा होरा आहे. या निवडणुकीतील राजकीय समीकरणांचा घेतलेला वेध…
सध्या लक्षवेधी असलेल्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होईल. यासोबतच खासदारांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणमधील एका जागेवर 30 मे रोजी आणि ओडिशातील राज्यसभेच्या एका जागेसाठी 13 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. अशा प्रकारे एकंदरीत येत्या काही दिवसांत 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या 59 जागांपैकी 25 जागा सध्या भाजपकडे आहेत.
दुसरीकडे, त्यांच्या मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वेळी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) खात्यात 3 जागा होत्या. त्याचप्रमाणे एक अपक्ष खासदार सोडला तर सध्या 59 पैकी 31 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे आहेत. या निवडणुकीत 31 जागा वाचविणे एनडीएसाठी मोठे आव्हान असेल. कारण विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांचे गणित असे सांगते की, यावेळी एनडीएला 7 ते 9 जागांचे नुकसान सहन करावे लागू शकते. दुसरीकडे, संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची एकूण संख्या 13 वर पोहोचली आहे. यात कॉंग्रेसचे 8, द्रमुकचे 3, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 खासदार आहेत. यावेळच्या राज्यसभा निवडणुकीत यूपीएला 2 ते 4 जागांचा फायदा होईल.
इतर पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास या 59 जागांपैकी सध्या समाजवादी पक्षाकडे 3, बिजू जनता दलाकडे 4, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि तेलंगण राष्ट्रसमितीकडे 3 खासदार आहेत. वायएसआर कॉंग्रेस, अकाली दल आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक खासदार आहे. अशा प्रकारे सध्याचा इतर पक्षांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत इतर पक्षांना 3 जागांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. राज्यनिहाय निवडणुकीतील विजयाच्या शक्यतांवर नजर टाकल्यास यावेळी उत्तर प्रदेशात 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला राज्यसभा निवडणुकीत सहन करावा लागणार आहे. बसपकडे सध्या 2 आणि कॉंग्रेसकडे 1 जागा आहे. मात्र, या तीनपैकी दोन जागा भाजपकडे जाऊ शकतात. अशा प्रकारे 2 जागांच्या फायद्यासह भाजप यावेळी आपले 7 उमेदवार उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवू शकतो. त्याचबरोबर सपाच्या खात्यात पूर्वीप्रमाणे केवळ 3 जागा येण्याची शक्यता आहे. उर्वरित 11 व्या जागेसाठी भाजप आणि सपा यांच्यात चुरस आहे; परंतु भाजपची आक्रमक शैली आणि चांगली रणनीती पाहता ही 8 वी जागाही भाजपच्या खात्यात जाऊ शकते, असे म्हणता येईल.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे 6 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यापैकी 3 जागा भाजपकडे आहेत, तर महाराष्ट्रात एकत्र सरकार चालविणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा आहे. आकड्यांच्या आधारावर यावेळी भाजपला महाराष्ट्रात एक जागा गमवावी लागू शकते. भाजपचे 2 उमेदवार जिंकू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी परस्पर समन्वयाने निवडणुका लढविल्या तर काही अपक्ष आमदार घेऊन 4 जागा जिंकून एका जागेचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो. तमिळनाडूत राज्यसभेच्या 6 जागांपैकी ज्यांच्यासाठी निवडणुका होणार आहेत, त्यातील 3-3 जागांवर सध्या द्रमुक आणि अण्णा द्रमुकचा कब्जा आहे. मात्र यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्ष द्रमुकला एक अधिकची जागा मिळू शकते. विधानसभेतील सदस्यसंख्येच्या आधारे द्रमुकचे 4 खासदार राज्यसभेत जाऊ शकतात तर अण्णा द्रमुकला दोनच जागा जिंकता येऊ शकतील.
संख्याबळाच्या आधारे बिहारमध्येही एनडीएला एक जागा गमवावी लागणार आहे. भाजप आपले दोन उमेदवार पूर्वीप्रमाणेच आरामात राज्यसभेवर पाठवू शकतो. परंतु भाजपचा मित्रपक्ष असणारा जेडीयू यावेळी एकच जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एका जागेचा फायदा आरजेडीला मिळून त्यांचा आकडा दोनवर जाऊ शकतो. भाजपला यावेळी सर्वाधिक नुकसान आंध्र प्रदेशात होणार आहे. या राज्यात 4 जागांवर निवडणुका होणार असून, त्यातील 3 सध्या भाजपच्या खात्यात असून, विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर यावेळी वायएसआर कॉंग्रेसचे उमेदवार या चारही जागांवर विजय मिळवू शकतात.
तेलंगणमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होत असून, या दोन्ही जागा सध्या राज्यातील सत्ताधारी टीआरएसच्या ताब्यात आहेत आणि संख्याबळाच्या आधारेही दोन्ही जागांवर टीआरएसचा विजय निश्चित आहे. या दोन जागांशिवाय तेलंगणमधून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार डॉ. बंडा प्रकाश यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर 30 मे रोजी पोटनिवडणूक होईल. विधान परिषदेवर नामनिर्देशित झाल्यानंतर डॉ. बंडा प्रकाश यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ही जागा यापूर्वीही टीआरएसच्या खात्यात होती आणि यावेळीही टीआरएसचा विजय निश्चित आहे.
कर्नाटक विधानसभेतील सदस्यसंख्येच्या आधारे भाजप मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही आपले दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतो, तर कॉंग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडणूक जिंकू शकतो. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी लढत आहे. सध्या या चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत; मात्र गेहलोत यांची तयारी पाहता भाजपला 3 जागांचे नुकसान सहन करावे लागू शकते. आमदारांच्या संख्येच्या आधारे भाजपचे 1 आणि कॉंग्रेसचे 2 खासदार राज्यसभेत जाऊ शकतात; मात्र अपक्ष आमदारांच्या बळावर कॉंग्रेस राजस्थानातील तिसरी जागाही जिंकू शकते. एकंदरीत देशभरातील 59 जागा आणि त्या-त्या राज्यांतील परिस्थिती पाहता राज्यसभा निवडणुकीत यंदा भाजप आणि एनडीएचे नुकसान होणार, अशी चिन्हे आहेत.
– विनायक सरदेसाई