नातेवाईकांचं येणंजाणं, नवऱ्याची सरबराई, मुलांची देखभाल आणि इतर अनेक कामं करण्यात अनेक स्त्रिया इतक्या गढून जातात की त्यांना त्या काळात स्वत:कडे पहायला जराही वेळ होत नाही. हे सारं त्या आपुलकीनं करत असतात. या साऱ्यातून मोकळं झाल्यावर स्वत:च्या मोकळ्या आकाशाची अनुभूती घेण्याची इच्छा यापैकी अनेकजणींच्या मनात असते. अशाच एका मैत्रिणीच्या आयुष्यात अशी वेळ आली. पण आतापर्यंत प्रेमाने वाढवलेल्या तिच्याच मुलीने आपल्या आईवर एक नवीन जबाबदारी टाकली. मुलगी ही आपलीच असते. त्यामुळे तिच्यासाठी जीव तुटणं स्वाभाविक आहे. पण हे सारं करताना स्वत:च्या मोकळ्या आकाशाचा विचार कधी करणार?
एक जुनी म्हण आहे, “लेक होईतो लेवून घ्यावं आणि सून येईतो खाऊन घ्यावं.’ ही म्हण आताच का आठवली असा तुम्हाला प्रश्न निश्चितच पडला असेल ना? माझ्याही मनात हा प्रश्न आला आहे. झालं असं की, काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रिण बॅंकेतून व्ही. आर. एस. घेऊन रिटायर झाली. आता खूप मज्जा करणार! हिंडणार, फिरणार, पुस्तकं वाचणार, सिनेमे बघणार, नाटकं बघणार अशी सप्तरंगी इंद्रधनुची स्वप्नं तिच्या डोळयात मी नाचताना पाहिली. सुटसुटीत संसार, नवरा आणि दोन लेकी. दोघींचंही लग्न झालेलं. त्या आपापल्या घरी सुखात नांदत होत्या.
माझी मैत्रिण तरूण म्हणता येईल इतपत वयाची. देखणं म्हणता येईल इतपत रूपाची अशी. पहिल्यापासून हुशार. बीएस्सीचा रिझल्ट लागायच्या आतच बॅंकेची परीक्षा पास झाली. ती नोकरी आणि डिग्रीसोबत लग्नाच्या वेदीवर चढली. मनासारखं झालं म्हणतात ना तसं सारं आयुष्य गेलं. जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून, बॅंकेचं लोन घेऊन घर, गाडी, सारं काही झालं. दोनच मुली. पहिली एमबीए झाली. तिच्याच पावलावर पाऊल टाकून दुसरी पण एमबीए झाली. एक परदेशात तर एक दूर परगावी. इथवरची कथा कशी राजाराणीच्या सुखी संसारासारखी.
आपल्या मुली तिने पाळणाघरातच वाढवल्या. नातेवाईकांचं येणंजाणं, नणंदांची माहेरपणं सारं काही हौशीनं करण्याच्या नादात तिला आपल्याला काय आवडतं हेच मुळी ती विसरून गेली होती. अचानक एका भल्या पहाटे मला तिचा फोन आला, “अग, मी आता बॅंकेतून व्ही. आर. एस. घेणार आणि मस्त आयुष्य एन्जॉय करणार. तसा त्रास काहीच झाला नाही गं. आतापर्यंत हवं तसं मिळालं. पण तू तर माझी सखी ना? मनातलं सांगू? जे मिळालं ना तेच गोड मानून घेतलं. मला हेच हवं होतं असं मनाला समजावत गेले. पण खर सांगू, आता मन वेडं झालंय. म्हणतंय, “इतके दिवस तुझं ऐकत गेलो, आता जरा माझं ऐक’ं मलाही आंनद झाला. चला एक तरी पाखरू हवं तसं उडणार तर! मधले काही दिवस गेले. फोन नाही, मेसेज नाही, तिचा पत्ताच नाही. मनाशीच बोलले, आता कुठे तिला तिचं आकाश मिळालय.
उडू दे जरा मनमोकळं! माझाही आनंद मनात मावत नव्हता. पण कसचं काय? काहीच दिवसात ऐन दुपारी म्हणजे माझ्या मध्यरात्री फोन आला. तिचाच होता. आवाजात उसनं पण भरपूर अवसान होतं. स्वत:ला समजावून सांगितलेलं जाणवत होतं. मला म्हणाली, “अगं धाकटी जातेय अमेरिकेला. तिची चिमणी कोणाजवळ राहणार? सासुबाई नाहीत तिला. तुला तर माहीत आहे. तेव्हा ती मला म्हणाली, “आई गं, तू तर आता रिकामीच आहेस. चिऊला तुझ्याजवळ ठेवते म्हणजे मी निर्धास्त मनानं जाईन. अवघ्या वर्षभराचा तर प्रश्न आहे! मग मी मोकळी नाही का? तिच मला सांगत होती. माझ्या सोबत तिचं तिलाचं समजावणं फोनवरूनसुद्धा मला जाणवत होतं. वर्षभराचा प्रश्न! संपलं! मोकळं आकाश दुपट्ट्यात लपेटलं गेलं!
जो येईल त्याच्यासोबत लेकीच्या आवडीचे पदार्थ पाठवणं, नातीचा प्रोग्रेस कळवायचा. जावयाची उठबस करायची. एसएमस करायचा. कारण अमेरिकेला शिकणाऱ्या लेकीला आईशी बोलायला वेळ नाही. कानाशी मोबाइल असतो गं, पण नवरा, मैत्रिणी, मित्र यांच्यातच वेळ जातो. आई समजून घेऊ शकते ना? इतरांची मनं राखावी लागतात गं. असं जीन्समधली आधुनिक लेक आईला सागांयची. सततच्या फोनमधून माझ्याशी बोलतांना तिचंच तिला समजावणं आहे हे मला जाणवत असायचं. हळूहळू लेकीचा अमेरिकेचा मुक्काम लांबत गेला. इकडं नात मोठी होऊ लागली. आजीशी लाडंलाडं बोलू लागली. नवऱ्यानं सोयीस्कररित्या आपली जबाबदारी तिच्यावर टाकून दिली आणि स्वत:ला वॉकिंगक्लब, पत्तेक्लब यात गुंतवून घेतलं.
गोष्ट इथेच संपत नाही. मनापासून मला माझ्या मैत्रिणीला सांगावंसं वाटलं! अगं, लेकीच्या आई, जरा स्वत:कडे बघ, खरचं का गं तुला वेळ होईल? स्वत:चं आयुष्यच नसतं का आपण जगायचं? लेक ही आपलीच असते. पण तरीही तिच्यासाठी नको एवढी झिजू बाई, त्याचं काही होणार नाही. तिला तुझी खरंच किती काळजी आहे? हाताशी मोबाइल, समोर कॉम्प्युटर, बाजारात मिळणारे अगदी घरच्यासारखे पदार्थ आहेत. या साऱ्यामध्ये तू कुठे आहेस? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लेकीच्या गळामिठीत सापडणारच नाही. कारण तुझ्याच गळ्यात हात अडकवून तीच म्हणेल- आई तू तर माझीच ना! माझ्याच मनात राहणारी.
प्रत्येक श्वासात जाणवणारी! तुझ्याच अस्तित्वाचा मी एक अंश आहे. तू आणि मी वेगळे का आहोत? याही प्रश्नांची उत्तरं तुझ्याजवळ नाहीत हे मला चांगलं माहीत आहे. तरी तुला हवं तसं मोकळ्या आकाशी जगण्याचा मान, उडण्याचा मान एक दिवस तरी तुझ्या लेकीनं तुला द्यावा आणि पुढे कधीतरी आपल्या लेकीजवळ हाच दिवस तिनेही मागावा असं मला मनापासून वाटतयं. आपली मुलं आपलाच अंश आहेत हे शंभर टक्के कबूल. पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्या भावनेचा, काही हवं नको जगण्याचा मान निश्चितच करावा. कारण आयुष्यात कितीतरी इच्छा राहिलेल्या असतात. त्या पूर्ण करण्याची वेळ ही आयुष्याच्या माध्यान्ही येत असते. ही वेळ जीवापाड जपून साजरी करून पुढील वाटचाल अधिक जोमानं करण्याची उमेद आपल्याला ताजी ठेवते.
– अरूणा सरनाईक