कंडक्टरने आवाज दिला. “नांदूर फाटा उतरून घ्या.’ “म्हातारे, मला बी हितच उतरायचंय. द्ये ती पिशवी हिकडं.’ तानाजीने म्हातारीच्या हातातली पिशवी घेतली. “पोरा, कुणाकडं आलास?’ “भिलारवाडीतला हाय म्या. फौजी हाय. सुट्ट्याला आलोय.’ तानाजी फौजी आहे हे समजताच म्हातारीला आणखीनच स्फुरण चढलं. “फौजी हायस व्हय.’ डोक्यावर बोचकं घेत म्हातारी निघून गेली.
तानाजीला पाहून पक्या आणि राहुल्या पळतच त्याच्याजवळ आले. “गड्या, कवाधरनं ताटकळत बसलोय.’ असं म्हणून त्याच्या हातातल्या बॅगा घेतल्या. “ये नाम्या, फौजी आलाय आपला. मस्तपैकी फक्कड च्या पाज.’ तान्याला पाहताच नाम्याने त्याला उचलून घेतलं. “लका, वजन वाढलं तुजं.’ तसा राहुल्या,’…अन आपल्या गावचं पण!’ चहा पीत तानाजी एस.टी.तल्या म्हातारी विषयी सांगू लागला. “…लका म्हातारीला बंदूक तरी द्दे; न्हायतर तुज्यासंग घिऊन तरी जा! गरज हाय आपल्या देशाला तुमच्यासारख्या माणसांची. बरं ते सोड, तू येणार म्हणून आप्पा सकाळच्यालाच डोंगरावर जाऊन बसल्यात.फोन लाव त्यांना.’ तानाजीने फोन लावून तो आल्याचं कळवलं. “…बरं आप्पा, राहुल्या आणि पक्याचा पण सैपाक कर म्हणावं म्हातारीला.’
तिघे पायपीट करत निघाले. “राहुल्या, दादा कसेत?’ “हाय जित्त. इळ ना माळ धरणात गेलेल्या जमिनीचा इचार करत बस्त्यात. आपल्या समद्यांच्याच तोंडाला पानं पुसलीत ह्यांनी. आपण आदबीनं हात जोडले, मान झुकवली की; ह्ये लोक आपल्याला लाचार समजत्यात. आपल्याच हक्कासाठी भीक मागायची येळ आलीय.’
भिलारवाडी, इनमीन चाळीस-एक उंबरठ्याचं गाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं. धरण बांधायचं म्हणून त्यात जमिनी गेल्या. गेल्या कुठल्या; ओरबाडल्याच! आज ना उद्या मोबदला मिळल या खोट्या आशेवर डोंगराच्या पायथ्याला गावकऱ्यांनी आसरा घेतला. शासकीय अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचे फक्त कागदी घोडे नाचवले.
दिवस… महिने… वर्षे सरत गेली. हातात ना दमडी पडली; ना डोक्यावर निटनिटकं छप्पर. कुठं कुडाची; तर कुठं मातीची कच्ची घरं बांधून ज्यानं त्यानं आपापली राहायची सोय केली. गावात ना वीज; ना रस्ता. सरकारी कचेऱ्यांच्या वाऱ्या केल्या; पण दरवेळी आश्वासनांची फक्त खैरातच मिळायची!
जसा राहुल्याच्या आत राग होता; तसाच तान्याच्याही. “हक्कासाठी शेवटच्या श्वासापतुर लढायचं.’ “तान्या, ह्या वाटणं जाऊ. पूल तुटलाय.’ तानाजी आश्चर्यचकित होऊन, “काय? आरं वरीस पण नाय झालं बांधून. पोरं शाळेला कशी जात्यात?’ “तुमि आर्मीवाले नाय का नदीवर लाकडाचे ओंडके बांधून जीव धोक्यात घालून सराव करता; तसंच!’ तिघांनी एकमेकांच्या हाताला धरून लाकडाच्या त्या डळमळीत पुलावरून नदी पार केली.
तानाजी दोन पावलं पुढं गेला आणि मागं वळून पाहू लागला. “काय बगतोस?’ “घटकाभर थांबायचं का पक्या? कुणी आलंच तर त्यांना मदत व्हायची.’ “काळजी नगस करू. रोज मरणाच्या दारातून तुमि जसं परत येता; तसं ह्यांना पण सवय झालीय. आमच्या जिवाच्या काळजीपोटी तुमि डोळ्यात तेल घालून तिकडं जागं असता; पर हितल्या “भस्मासुरांनी’ त्यांची डोळ्यावरची कातडीच शिवून घेतलीय!’
टेकाडावरून नजरेच्या टप्प्यात गाव दिसत होतं. “गड्यांनो, आपलं गाव बगितलं की प्वाटच भरलं.’ “तान्या, हिकडं आमच्या पोटात कावळं वरडायला लागल्यात! चल बिगीबिगी.’ दारात तान्याची पोटुशी बायको हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. तान्याच्या आईनं भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. जेवणं आटोपली.
“आप्पा, म्या तुमच्यासाठी बगा काय आणलंय!’ तानाजीने पिशवीतून रेडिओ बाहेर काढला आणि आप्पांच्या हातात ठेवला. तसा राहुल्या, “येता येता छटाकभर इज पण आणायची!’ “थांब राहुल्या. दावतो.’ तानाजीने सेल टाकून रेडिओ चालू केला. क्षणात आप्पांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. दुसऱ्या दिवसापासून रेडिओमधल्या गाण्यांबरोबर दुपारच्यावेळी पारावरच्या गप्पांचा फड रंगत गेला.
“देवकी, तुला काय वाटतं; पोरगी का पोरगं व्हईल?’ तशी देवकी हसून,”लयी लाथा बसत्यात पोटात! मला तर पोरगंच वाटतंय.’ “पर तुला सांगू, पोरगी जरी झाली ना; तिला बी माज्यावाणी आर्मीतच भरती करणार.’ “बरं. तुमच्या शब्दा भायर हाय का आमी?’ दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. “म्या लयी नशीबवान हाय. तुमच्या नावचं कुंकू माझ्या भाळी लेत्ये!’
सीमेवरच्या लढाया, तिथलं आयुष्य जगतानाचे अनुभव सांगताना पोरांच्या गराड्यात तान्या पुरता अडकून जायचा आणि मग एखाद्या लहानग्याची छाती फुगून यायची. “दाद्या, म्या बी मोट्टा झाल्यावर तुज्यावाणी फौजी व्हनार आणि दुस्मनाला धाडधाड गोळ्या घालणार!’ जणू कधी त्यांच्या स्वप्नाला पंख फुटतील; तान्यालाही असंच वाटायचं. “पक्या, त्ये डोंगरावर काय व्हतंय?’ “हाय कुणीतरी मोट्टा माणूस. कसलं तरी व्हिला का काय म्हणत्यात बांधतोय.'”पर वरली झाडं? परवानगी कशी मिळाली?’ पक्या हसून, “तू नीट ऐकलं न्हायस. म्या म्हणलो “मोट्टा’ माणूस हाय!’
बघताबघता काही दिवस गेले. पावसाळा सुरू झाला होता. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. “अहो, माज्या पोटात लयी जोरात कळा येत्यात.’ तान्या तसल्या पावसात हातात कंदील घेऊन बाहेर पडला. “पक्या, राहुल्या मला वाटतं हिला दवाखान्यात हलवलं पायजेल.’ “अरं, पर असल्या पावसात कसं जायचं? काळ्याकुट्ट अंधारात वाट चाचपडत जायचं म्हंजी… अन नदीवरून जाताना वहिनींचा जीव नगं धोक्यात घालायला.’ “व्हय तान्या, मला पक्याचं पटतंय. गावातल्या गोदाबाईला दावू.’
पावसाचा जोर काही केल्या कमी होत नव्हता. सोसाट्याच्या वाऱ्यानं घरावरची छपरं फडफड करत होती. अचानक वीज कडाडली आणि काहीतरी फुटल्यासारखा जोराचा आवाज झाला. “पक्या, ह्यो आवाज कसला?’ “जरा म्होरं जाऊन यायचं का?’ म्हणत ते थोडं पुढं गेले. अचानक तान्याची नजर डोंगरावर गेली. समोरचं चित्र पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. डोंगरावरची माती आणि झाडं सरसर करत खाली येत होती.
अख्खाच्या अख्खा डोंगरच जणू ढासळत होता. तान्या जोरात ओरडला. “…पक्या, राहुल्या पळा.’ सगळे सैरावैरा पळत सुटली आणि हाहा म्हणता काही कळायच्या आतच दरडीखाली काही घरं गाडली गेली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तान्या वेड्यासारखा मातीचा राडारोडा बाजूला सारत होता. कधी आप्पांना, कधी त्याच्या आईला; तर कधी देवकीला जीवाच्या आकांतानं आवाज देत होता. सगळीकडं फक्त पळापळ आणि आक्रोश कानी पडत होता. कुणाच्याच हाती काही लागत नव्हतं. ती काळरात्र सरता सरत नव्हती. “तान्या, समदं संपलं.’ म्हणत पक्या आणि राहुल्या ढसाढसा रडत होते.
दिवस उजाडला. डोंगर खचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मदतकार्य सुरू झालं. दिवसरात्र कुजलेले मडे उकरताना पाहून; आपलं कुणीतरी जिवंत सापडल ही आशाच जणू संपुष्टात आली होती. कधी तुटलेला हात; तर कधी मुंडकी वर येत होती. भग्नावस्थेतील भिंतीला अर्धवट अडकलेला रेडिओ पाहून तान्या भिंतीजवळ गेला.
“आप्पा…’ म्हणून तो मोठ्याने ओरडला. गावच्या थडग्यावर उन्मळून पडलेल्या झाडाला पाठ देऊन तान्या हताश होऊन बसला होता. बाजूला बसलेल्या एका पोरानं रेडिओचं बटन दाबलं. “…आणि आता दोन मिनिटं भिलार वाडीतल्या मृतांना श्रद्धांजली म्हणून शांतता पाळू या.’ तान्या ओंडक्याचा आधार घेत जागेवर उभा राहिला. त्याच्या अंगात कसला त्राण म्हणून नव्हता. पाय लटपटत होते. अंग थरथरत होतं.
खाली मान घालून तो अश्रू ढाळत होता. अचानक समोरच्या ढिगाऱ्याखालून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती स्मशान शांतता भंग पावली. तान्या सगळं आवसान एकवटून त्या दिशेनं पळत सुटला. मातीच्या ढिगाऱ्यात एका खांडाखाली त्याला देवकी दिसली. तिच्या डोळ्यांची उघडझाप होत होती. एका हातात तिने बाळाला घट्ट धरून ठेवलं होतं.
“देवकी…’ म्हणून हृदय पिळवटून टाकणारी तान्याची हाक ऐकून; नशिबाने वाचलेली काही लोकं त्याच्या मदतीला धावून आली. देवकीला आणि बाळाला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं. तान्या वेड्यासारखा कधी आपल्या बायकोचे; तर कधी बाळाचे मुके घेत होता. मात्र दुसऱ्याच क्षणी त्या चिखलात अंग दुमडून गाढ झोपी गेलेल्या आपल्या आई-बापाला पाहून; तान्याच्या अश्रूचा बांध फुटला…
अमोल भालेराव