मामा म्हणजे सर्वात जवळचा नातेवाईक आणि बहुदा सर्वात आवडतासुद्धा. खास करून मुलांचा. “मामाच्या गावाला जाऊया’ हा शालेय जीवनातील सुटीतला सर्वात आनंदाचा भाग.
अगदी समजत नव्हते तेव्हापासून एखादा अपवाद वगळला तर मामा हा सदैव मुलांचा लाडकाच राहिलेला आहे. काकापेक्षाही! निदान आपल्या मराठी मुलुखात तरी. तसा आपल्याकडच्या लहान मुलांना भेटणारा पहिला मामा म्हणजे चांदोमामा. रात्रीच्या वेळी कोठूनही दिसणारा. रस्त्याने चालताना आपल्याबरोबर चालणारा. आपण थांबलो की थांबणारा. या मामाचे-
चांदोबा चांदोबा भागलास का,
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचं झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी…
हे गाणे आईने, वडिलांनी, मावशीने कितीतरी वेळा म्हणून दाखवले असेल. अगदी पिढ्यांमागून पिढ्या चांदोमामा हा मुलांचा आणि मुलांसाठी मोठ्यांचाही आवडता आहे.
मामांच्या बाबतीत आम्ही लकी होतो. आजही ते बालपणीचे दिवस आठवले की, मन हळवे होते. पण खरा मामा कितीही चांगला, आवडता असला तरी गोष्टींचा विचार केला तर मामा ही जमात तशी बदनामच. दोन मामांमुळे. पहिला कंस मामा आणि दुसरा शकुनी मामा.
प्रत्यक्षात कंस आणि शकुनी ही दोन्ही नावे असलेली जितीजागती माणसे माझ्या आयुष्यात मी कधीही पाहिली नाहीत. ही मामा मंडळी सकारण अकारण बदनाम असली तरी इतिहासातील एक मामा मात्र अजरामर झालेला आहे. तो म्हणजे शेलार मामा! त्यांच्या पराक्रमासाठी आणि त्यांच्या त्या एका वाक्यासाठी-“ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत.’
लहानपणी गड आला पण सिंह गेला ही गोष्ट किती तरी वेळा ऐकली वाचली आहे. सिंहगड पुण्यापासून जवळच असल्याने सिंहगडावर अनेकदा जाणे झाले आहे. लहानपणी तेथे गेल्यावर तानाजी कोणत्या मार्गाने गडावर आला असेल, त्याची उदेभानूबरोबर लढाई कोठे झाली असेल वगैरेबाबत मोठीच उत्सुकता असायची.
एकदा आम्ही सगळे सिंहगडावर गेलो असता माझ्या भाच्याने एक प्रश्न विचारला होता की, शेलारमामाने दोर कोठले कापले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काही आम्हा कोणाला देता आले नाही, पण त्या प्रश्नाने मनात अनेक प्रश्नांचे मोहळ उठले. आपला मुलगा रायबाच्या लग्नाचे आमंत्रण महाराजांना देण्यासाठी तानाजी मालुसरे गेले होते. तेव्हा कोंडाणा किल्ला मोगलांच्या ताब्यात असल्याची खंत मॉंसाहेब जिजाऊंनी बोलून दाखवताच “आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायबाचे’ असे म्हणून कोंडाणा किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर तानाजी निघाले. घनघोर लढाई झाली. मोगल किल्लेदार उदेभानबरोबर झालेल्या लढाईत तानाजी घायाळ होऊन पडले.
तानाजी मालुसरे पडल्यावर मावळ्यांचे धैर्य मावळले. ते लढाई सोडून पळून जायच्या तयारीला लागले. तेव्हा शेलार मामा पुढे झाले. म्हणाले, “थांबा, ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत.’ त्या वाक्याने मावळे परत फिरले, त्वेषाने लढून त्यांनी कोंडाणा जिंकून घेतला. तानाजी पडल्याचे कळल्यावर महाराज म्हणाले, “गड आला पण माझा सिंह गेला.’ आणि कोंडाणा हा सिंहगड बनला.
शेलार मामाचे ते वाक्य मात्र आजही अत्यंत उपयुक्त आहे. “ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत.’ खरंच, कोणते दोर केव्हा कापून टाकायचे हे समजले, आणि तसे कापले, तर आयुष्य यशस्वी तर होईलच, पण किती तरी सुखी होईल.
-अनुराधा पवार