इंग्रजीमध्ये जी प्रणाली “मिनिमॅलिझम’ म्हणून ओळखली जाते त्यालाच मी “अल्पवाद’ अशी भारतीय संज्ञा दिली आहे. या व्यवहाराला “अवरार्धवाद’ किंवा “न्यूनतमवाद’ असंही म्हणता येईल कारण न्यूनतम आणि अवरार्ध हे इंग्रजी “मिनिमम’ या शब्दाला समांतर शब्द आहेत.
वास्तविक गेल्या शतकात कला आणि वास्तुरचना या क्षेत्रांमध्ये अल्पवादाला सुरुवात झाली, असं मानण्यात येतं. पण या विचाराला माझा विरोध आहे. आपल्याकडे कित्येक शतकं वेगवेगळ्या क्षेत्रांत आपण अल्पवाद व्यवहारात आणत आहोत, अशी माझी धारणा आहे. मी या दिशेनं विचार करायला लागलो त्याचं कारण अगदी वेगळं आहे. मोटारगाड्यांचा विकास करणाऱ्या कंपनीत मी काम करीत होतो. त्यावेळी आम्ही सामान्य जनतेला परवडेल अशा छोट्या गाडीचा विकास करत होतो. छोट्या गाडीची प्रारूपं तर तयार झाली; परंतु अपेक्षेप्रमाणे निर्मितीचा खर्च कमी होण्याची चिन्हं दिसेनात. कंपनीच्या अध्यक्षांनी खर्च कपातीसाठी “नव्या दृष्टिकोनाचा गट’ निर्माण करून मला गटाचा प्रमुख केलं. ही मोठीच जबाबदारी होती.
अतिशय कमी वेळात माझ्या गटानं अनेक विविध कल्पना मांडल्या. त्यानुसार नवीन भाग आणि प्रणाली तयार केल्या. परिणामी उत्पादनाच्या खर्चात मोठीच बचत झाली. यामुळे एका मोठ्या ऑस्ट्रियन कंपनीनं मला “भारतीय अल्पवाद’ या विषयावर त्यांच्या वार्षिक परिसंवादात व्याख्यान देण्याकरता आमंत्रित केलं. प्रवासाचा तसंच तेथील राहण्याचा खर्च त्या कंपनीनंच केला. (माझं हे 10 भागांतील भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे.) नंतर लक्षात आलं की, पाश्चिमात्य देशांना आपण पूर्वेकडचे लोक काटकसरीनं कसं जीवन जगतो, कमी खर्चात कशा वस्तू निर्माण करू शकतो याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मग मीही अल्पवादाचा बारकाईनं अभ्यास करू लागलो.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण-विशेषत: मध्यमवर्गीय-अल्पवाद कित्येक पिढ्या अनुसरतो आहोत. आज रिसायकलिंग (पुनर्वापर), रिपर्पझिंग (पुनर्योजना) हे परवलीचे शब्द झाले आहेत. परंतु जुना काळ आठवा. मला तर लख्ख आठवत आहे की, जुन्या विजारींपासून रेशनचं धान्य आणण्यासाठी पिशव्या, जुन्या साड्यांपासून पांघरुण किंवा पडदे असा पुनर्वापर होत होता. कुठलीही वस्तू टाकण्यापूर्वी त्याचा दहादा विचार व्हायचा की टाकण्यापेक्षा त्यातून काही बनवता येऊ शकेल का? भोपळ्याच्या बिया टाकून न देता त्या धुऊन, वाळवून आणि भाजून खाण्यासाठी वापरल्या जायच्या.
अनेक फळभाज्यांच्या सालींपासून माझ्या आईनं रुचकर चटण्या बनवलेल्या मी पाहिलेल्या आहेत-खाल्ल्या आहेत. अगदी नासलेलं दूधही टाकून न देता त्यापासून काही स्वादिष्ट पदार्थ बनवले जायचे. साबणाची वडी झिजून पातळ झाली की नव्या वडीला चिकटवून वापरली जायची. आमटी किंवा इतर पदार्थांसाठी चिंच किंवा लिंबू वापरून झालं की ते टाकून न देता पितळेची किंवा तांब्याची भांडी घासून चकचकीत करण्यासाठी त्याचा वापर होई. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
मी स्वत: शाळेत असताना जुन्या चष्म्याची भिंगं वापरून दुर्बिणी तसंच एपिडायास्कोप (चित्रपरिदर्शक) नावाचं उपकरण बनवलं होतं. एपिडायास्कोपमध्ये चक्क कागदावरचा मजकूर किंवा चित्रं मोठ्या पडद्यावर दाखवता येतात. वृत्तपत्रातील व्यंगचित्रांची मालिका त्यावर दाखवताना त्याचबरोबर त्याचं कथानक सांगत एक कार्यक्रमही केल्याचं मला चांगलं आठवतं.
या पूर्वापार चालत आलेल्या अल्पवादाचं अनुकरण आपण तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पूर्वीच करायला हवं होतं. मात्र, गरज ही शोधाची जननी असते या न्यायानं जेव्हा विविध उत्पादनांच्या विकसनात खर्च कमी करण्याची आवश्यकता भासली तेव्हा अल्पवाद उपयोगात आला. याचं एक उदाहरण म्हणजे गाड्यांचे दरवाजे जेव्हा खास पोलादाच्या पत्र्यापासून बनवले जातात तेव्हा दरवाजाच्या खिडकीच्या पोकळ भागाचा पत्रा कापून काढावा लागतो. हा काढून टाकलेला पत्रा भंगार (स्क्रॅप) म्हणून टाकून न देता त्यापासून लहान भाग बनवता येतात आणि खूप खर्च वाचतो. मूळ मोठ्या भागाला मदर पार्ट (मातृखंड) आणि काढलेल्या पत्र्यापासून बनवलेल्या भागाला डॉटर पार्ट (कन्याखंड) असं म्हटलं जातं. आपलं दुर्दैव हे की, आपण पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींचा गरज पडल्याशिवाय विचार करत नाही!
– श्रीनिवास शारंगपाणी