नवी दिल्ली – बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संबोधित करताना कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, मोदी सरकार सतत शेतकऱ्यांच्या हिताची पावले उचलत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगायचे आहे की नवीन कृषी कायदामुळे बाजार समित्या संपणार नाहीत, हे पुन्हा-पुन्हा सांगितले जात आहे. पण अर्थसंकल्पात असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की बाजार समित्या संपणार नाहीत, तर त्या अधिक बळकट केल्या जातील.
आज एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) कृषी पायाभूत सुविधा निधी वापरण्यास सक्षम होईल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच जगभरात नारळ व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाईल. यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने दिली जातील. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे ते म्हणाले.