-वंदना बर्वे
बिहारचा गड कायम राखण्यात रालोआला यश आलं असलं तरी; भाजपची खरी परीक्षा होणे आहे ती दीदींच्या मुलुखात. यातही प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती अमित शहा यांची. काहीही करून पश्चिम बंगालमध्ये पताका फडकविण्याचा भाजपचा डाव विरोधकांना उधळून लावायचा आहे. मात्र, एकमेकांना सत्ताच्यूत करण्याचा हा खेळ अद्याप रंगात यायचा आहे!
तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता दीदी यांनी नऊ वर्षांपूर्वी अर्थात 2011 मध्ये डाव्या पक्षांच्या 34 वर्षांच्या साम्राज्याला जमीनदोस्त करीत पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळेस ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 184 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाचं “जनधन खातं’सुद्धा उघडलं नव्हतं. यानंतर, 2016 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. यावेळेस दीदींच्या पक्षाने 293 जागा लढविल्या होत्या आणि 211 आमदार निवडून आले. माकपाने 148 जागा लढविल्या आणि फक्त 26 जागांवर विजय मिळविला. कॉंग्रेसने 92 जागा लढविल्या आणि 44 आमदार निवडून आले. याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 291 उमेदवार मैदानात उतरविले होते आणि फक्त तीन आमदार निवडून आले होते. अर्थातच यावेळेस संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. एकामागून एक अशा अनेक राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकत होता. मात्र, पश्चिम बंगाल यास अपवाद होता.
पश्चिम बंगालच्या गेल्या दोन निवडणुकांची माहिती नमूद करण्याचं खास कारण आहे. भाजपचे फक्त तीन आमदार आहेत. परंतु, भाजपने बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. अर्थातच, मागच्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 18 खासदार निवडून आले आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
आता पुढच्या वर्षी मे महिन्यात बंगालमध्ये निवडणूक होणे आहे. बिहारची निवडणूक आटोपली आहे. सुशासनबाबू नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. आता भाजपनं आपला मोर्चा वळविला आहे तो बंगालकडे. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच या राज्याचा दौरा केला. तसं बघितलं तर, बंगालचा विजय शहा यांचा “ड्रीम प्रोजेक्ट’ आहे.
दुसरीकडे, भाजपला बंगालच्या सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काय-काय करता येईल? या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की, देशभरातील कट्टर शत्रू पक्ष भाजपविरोधात एकजूट होत आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी कॉंग्रेसला सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक एकजुटीने लढवावी, असा वडीलकीचा सल्ला भाकपा (माले) दीपंकर भट्टाचार्य यांनी अलीकडेच दिला होता. हा प्रयोग यशस्वी होणार की अयशस्वी हे आताच सांगता येणार नाही. मात्र, भट्टाचार्य यांच्या विधानाने साचलेल्या पाण्यात दगड मारण्याचं काम केलं आहे. याची प्रयोगशीलता तपासून बघितली जात आहे. मुळात, डाव्या पक्षांनी बंगाल आणि आसाममध्ये भाजपला नंबर एकचा शत्रू मानून निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे. यासाठी गरज पडल्यास तृणमूल कॉंग्रेससोबत हातमिळवणी शक्य आहे. दीपंकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात डाव्या पक्षांना बिहारमध्ये 12 जागांवर विजय मिळवला आहे, हे येथे उल्लेखनीय.
तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि कॉंग्रेस या तीन पक्षांची आघाडी बनविण्याला सर्वात मोठा विरोध आहे तो डाव्या पक्षांचा. अन्य राज्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी बंगाल वेगळं राज्य आहे. यामुळे भाजप नव्हे तर तृणमूल कॉंग्रेस हाच डाव्यांचा खरा शत्रू आहे, असं डाव्यांचं मत आहे. भारतीय लोकशाही आणि नागरिकांसाठी भाजप हाच सर्वात प्रमुख शत्रू आहे, असं भट्टाचार्य यांचं मत आहे. त्यांच्या या विधानानंतर बंगालमधील अलीमुद्दीन स्ट्रीटवरील माकपाच्या मुख्यालयात भूकंप आला आहे. अध्यक्ष विमान बसू यांच्यासह अनेक डाव्या नेत्यांनी दीपंकर यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. भट्टाचार्य यांचा सल्ला डाव्या पक्षांना एवढा जिव्हारी लागला की विमान बसू यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा समाचार घेतला. बसू यांच्या मते, भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत. अशा परिस्थितीत बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेससोबत निवडणूक किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नाही. डावे पक्ष याठिकाणी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप दोघांचा मुकाबला करतील. तृणमूल कॉंग्रेसचा कोणताही आदर्श नाही किंवा नैतिकता नाही. बंगालमध्ये भाजपला तेच घेऊन आले आहेत.
माकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य मोहम्मद सलीम यांच्यानुसार, वातानुकूलित खोलीत बसून बंगालचं राजकारण करता येत नाही. उंटावर बसून शेळ्या हाकण्यासारखा हा प्रकार आहे. तृणमूल कॉंग्रेसची स्थापना करून ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत हातमिळवणी केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा शिरकाव आणि डाव्या पक्षांची वाताहत होण्यामागे ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत, असंही त्यांनी सुनावलं.
अशात, मजेची बाब अशी की, भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याच्या सूचनेचे तृणमूल कॉंग्रेसने स्वागत केले आहे. तृ.कॉं.चे लोकसभेतील नेते सौगत राय यांच्यानुसार, समान विचारधारा आणि समान लक्ष्य असलेल्या पक्षांनी वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. हीच चूक नेपोलियन आणि हिटलरने केली होती आणि खूप नुकसान झाल्यानंतर त्यांना जाग आली. ही चूक डाव्या पक्षांनी करू नये. राष्ट्रहित लक्षात ठेवून डाव्या पक्षांनी भाजपविरोधी लढ्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या दीदींची मदत केली पाहिजे, असा सल्लासुद्धा त्यांनी दिला. प. बंगालमध्ये 2011 पासून डाव्या पक्षांना उतरती कळा लागली आहे. 2016 च्या निवडणुकीत डाव्यांना 19 टक्के मते मिळाली होती.
मात्र, भाजपने या मुद्द्यावर मौन पाळले आहे. भाजप फक्त हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आगामी निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. बिहारनंतर बंगालमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळवून सत्ता काबीज करणं आमचं लक्ष्य आहे. बिहार निवडणूक निकालांचा पक्षाला बंगालमध्ये नक्की फायदा मिळेल, असंही ते म्हणाले.