येडियुरप्पा यांच्यापुढे मंत्र्यांची निवड करण्याचे आव्हान
बंगळूर -कर्नाटकमध्ये भाजप सत्तेवर येऊन काही दिवस उलटले तरी अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. अशात मंत्रिमंडळ स्थापनेला आणखी पाच ते सहा दिवस विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकमधील राजकीय बंडामुळे मागील महिन्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपली बाजू आणखी भक्कम करताना त्यांनी 29 जुलैला विधानसभेत बहुमत सिद्ध केले. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची स्थापना अजूनही झालेली नाही.
त्यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. त्याशिवाय, मंत्रिमंडळ स्थापनेवरून त्यांना पक्षांतर्गत दबावालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मौन सोडत येडियुरप्पा यांनी पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन करण्याची ग्वाही शुक्रवारी दिली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून मंत्र्यांची नावे निश्चित करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आता येडियुरप्पा 5 ऑगस्टला रात्री दिल्लीवारीवर जाणार आहेत. पुढील दिवशी ते भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि इतर प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्या भेटीत कर्नाटक मंत्रिमंडळाच्या रचनेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची रचना करताना मंत्र्यांची निवड करण्याचे मोठेच आव्हान येडियुरप्पा यांच्यापुढे आहे. मागील सरकारला भोवलेल्या नाराजीचा सामना आपल्यालाही करावा लागू नये याची दक्षता येडियुरप्पा यांच्याकडून घेतली जात आहे.
त्यामुळेच मंत्रिमंडळ स्थापनेला विलंब झाल्याचे संकेत आहेत. मंत्रिपदासाठी इच्छूूक असणाऱ्या भाजपमधील आमदारांचे समाधान पहिल्यांदा येडियुरप्पा यांना करावे लागणार आहे. त्याशिवाय, भाजपेतर आमदारांचा विचारही त्यांना करावा लागणार आहे.
कॉंग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांचे बंड आणि काही अपक्षांनी मागील सरकारचा काढलेला पाठिंबा आदींमुळे भाजपला कर्नाटकची सत्ता मिळू शकली. ती बाब येडियुरप्पा यांना विसरून चालणार नाही. त्यामुळे इच्छुकांना झुलवण्यासाठी पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 10 ते 12 मंत्र्यांचाच समावेश केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.