पुणे – मीटर रीडिंग एजन्सीकडून मीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. त्यासोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. परिणामी महावितरणलादेखील ग्राहकांचा रोष पत्कारावा लागतो. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. वीजमीटरचे चुकीचे रीडिंग घेणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करा, अशा एजन्सी बडतर्फ करा, थेट काळ्या यादीत टाका असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी येथे दिले.|
येथील “प्रकाशभवन’मध्ये नुकतेच आयोजित पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक (संचालन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्व मनीष वाठ (चाचणी), सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती) व परेश भागवत (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
वीज क्षेत्र हा उधारीचा नव्हे तर रोखीचा व्यवसाय आहे. मात्र एकीकडे वीजग्राहकांकडे सुमारे 65 हजार 437 कोटींची थकबाकी आणि दुसरीकडे कर्ज, वीजकंपन्या व इतरांची अशी 58 हजार 940 कोटींची देणी अशा दुहेरी कात्रीतून मार्ग काढण्यासाठी महावितरणसमोर वीजबिलांची वसुली हाच एकमेव मार्ग आहे व महसुलाचादेखील एकमेव स्त्रोत आहे.
विजेची गरज मूलभूत झालेली असल्याने ग्राहकांना देखील वीजबिलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा केला तरच महावितरण तगू शकेल, असेही विजय सिंघल यांनी म्हणाले.
वीजबिल प्राधान्याने भरा
मोबाइल, टीव्हीच्या केबल किंवा डीटीएच सेवांचे मुदतीत रिचार्ज केले नाही तर सेवा तत्काळ खंडित केली जाते. मात्र जगण्यातील बहुतांश गोष्टी ज्या विजेवरच अवलंबून आहेत, त्या विजेच्या बिलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वीजबिल प्राधान्याने भरले पाहिजे, असे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.