Lok sabha elections – लोकसभा निवडणुका वेळेवरच होणार असून मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग सात जानेवारीपासून राज्यांच्या दौऱ्यांना प्रारंभ करणार आहे.
आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष आधीच तयारीत आहे तर इतर पक्ष देखील तयारी करताना दिसून येत आहे.देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होऊन एप्रिलमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीची घोषणा १० मार्च रोजी झाली होती. त्यानंतर ११ एप्रिल ते १९ मेदरम्यान देशभरात सात टप्प्यांत मतदान झाले.
२०२४ च्या तयारीसंदर्भात निवडणूक आयोगाने ११-१२ जानेवारी रोजी बिहारसह अनेक राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या दोनदिवसीय बैठकीत तयारीचा आढावा घेऊन संभाव्य तारखांवर चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणूक आयोग ७ जानेवारीपासून आंध्र आणि तामिळनाडूला भेट देऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात करेल.
२०१९ च्या तुलनेत या वेळच्या निवडणुका थोड्या लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी होळी २५ मार्चला म्हणजेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आहे. हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातील.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदली-नियुक्तीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे की, निवडणुकीच्या कामात थेट सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये किंवा ते ज्या जिल्ह्यात मुक्काम करत आहेत.
त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही. या वेळी लवकर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बदली-पोस्टिंग प्रक्रिया पूर्ण करायची आहे.