पीक पाहणी कार्यालयातूनच; सदोष पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी
सातारा – पिकाची नुकसानभरपाई, कर्जपुरवाठा तसेच इतर महत्वाच्या कामांसाठी पीक पाहणी महत्त्वाची असते. मात्र, मात्र तलाठी हे काम शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्याऐवजी कार्यालयात बसूनच पीक पाहणी करतात. या सदोष पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओल्या दुष्काळामुळे थोडी फार वाचलेली पिकेही उताऱ्यावर नोंद नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत.
विविध पिकांखाली असलेल्या जमिनीचे अचूक क्षेत्र, घेण्यात आलेल्या पिकांच्या विविध प्रकारांची योग्य, खरी अणि अचूक नोंद असणे अत्यावश्यक असल्यानेच गावागावांत तलाठ्यांच्या माध्यमातून पीक पाहणी केली जाते. गाव नमुना नंबर 12 अचूक असणे महत्वाचे आहे. हे काम फक्त आणि फक्त तलाठीच करु शकतात. मात्र, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतातील पिकांची पाहणी करुन त्याची नोंद गाव नमुना बारामध्ये करणे गरजेचे असताना जिल्ह्यातील गावागावांतील आण्णासाहेबांनी कार्यालयात अथवा तालुक्याच्या ठिकाणी बसूनच गावातील पीक पाणी करण्याचा धडाका लावला आहे.
गावकामगार तलाठ्यांच्या या सदोष पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा तर लागतो आहेच. पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांच्या दारात गेल्यानंतर या सदोष पीक पाहणीचा मोठा फटका बसत आहे.
शेतकऱ्यांना विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा बॅंकेने सात बारा उताऱ्यावरील पिकांची नोंद पाहूनच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. पण तलाठ्यांनी केलेल्या सदोष पीक पाहणीमुळे दुष्काळावर मात करून शेतात फळबागा किंवा नगदी पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पतपुरवठा होणे अवघड होऊन बसले आहे.
जिल्हा बॅंक व विकास सेवा सोसायटयांनी कर्ज पुरवठा करताना जिरायत व बागायत अशा दोन गटांत शेतीचे वर्गीकरण करून त्यानुसारच कर्जपुरवठ्याच्या दर ठरवला आहे. बागायत क्षेत्रात ऊस,द्राक्ष, कांदा, आले, फळबाग, हळद, डाळिंब, आंबा, केळी, पेरु, स्ट्रॉबेरी, बटाटा, टिश्यू कल्चर आदी पिकांचा समावेश केला आहे. तर जिरायत क्षेत्रात भुईमुग, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य यांचा समावेश केला आहे.
शेती क्षेत्रात पदोपदी येत असलेल्या बोगस आकडेवारीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे.
गाव नमुना बाराच्या नोंदी बरोबर घेऊन त्या साता बाराच्या फॉर्मवर भरायच्या असतात. त्यावर पिकांची नोंद करायची असते. प्रत्यक्ष पाहणी करून तलाठ्याने ही नोंद करावी असा नियम आहे. मात्र, बहुतेक तलाठी प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तलाठ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करायचे ठरविले तर साधा आठ “अ’चा नमुना मिळायला सहा महिने लागतील. त्यामुळे तलाठी तालुक्याच्या गावात बसून खानेपूर्ती पीक पाहणी करतो. तीच आकडेवारी तहसीलकडे जाते. याच आकडेवारीच्या आधारावर सरकार योजना बनविते.
खोट्या आकडेवारीवर योजनांचे भवितव्य असते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच तर ती सदोष पीक पाहणीमुळे तोकडी नुकसानभरपाई मिळते. तर काही ठिकाणी नुकसानभरपाई किवा कर्जाचा जादा लाभ मिळावा, यासाठी शेतात फळबाग दाखविली जाते. कारण जेवढी मौल्यवान फळबाग तेवढी नुकसानभरपाई जास्त. आण्णासाहेबांच्या कृपेने हा पराक्रम बहुतेक गावपुढाऱ्यांच्या नशिबात येत असल्याचा आरोप काही शेतकत्यांनी केला आहे.
असा होतो कर्जपुरवठा
बागायती पिके ःऊस- एक लाख, कांदा- 34 हजार, आले- एक लाख 15 हजार, आंबा- 18 हजार, द्राक्ष-एक लाख 96 हजार, निर्यातक्षम द्राक्ष दोन लाख 89 हजार, स्ट्रॉबेरी- तीन लाख 12 हजार, निर्यातक्षम स्ट्रॉबेरी- पाच लाख आठ हजार, डाळिंब- एक लाख 15 हजार, पेरु- 66 हजार.
जिरायती पिके ःभुईमुग- 30 हजार, ज्वारी-20 हजार, बाजरी- 17 हजार, मका- 24हजार. (सर्व दर हेक्टरी आहेत.)
तलाठ्यांच्या चुकीचा त्रास होतो
तलाठ्यांनी शेतावर येत पीक पाहणी करणे गरजेचे असताना ते कधीच तसे करत नाहीत. ते ऐकीव किवा पारंपरिक पध्दतीने पीक पाहणी करतात. आम्ही परिस्थितीवर मात करुन फळबागा अथवा इतर पिके करत असतो. पण उताऱ्यावर चुकीच्या नोंदी असल्याने बॅंका आम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
– दीपक येलमर, शेतकरी