मुंबई – इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी अनिल पटेल यांची नियुक्ती केल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. हा सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
पटेल यांनी याआधी गुजरात क्रिकेट संघटनेचे सचिवपद भूषवले आहे. तसेच 2017, 18 आणि 19 या कालावधीत ते भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाच्या यशाची टक्केवारी 100 टक्के राहिली आहे. पटेल व्यवस्थापक असताना भारताने खेळलेल्या सर्व 9 मालिका जिंकल्या होत्या.
भारताने 2021 ते 2023 या कालावधीत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत एकूण 18 कसोटी सामने खेळले असून त्यात 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर, 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची भारतीय संघाची ही दुसरी वेळ आहे. गेल्या स्पर्धेत अंतिम लढतीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू – सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार.