मुंबई – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया मंगळवार, उद्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध बॅंकांमधून या नोटा बदलून घेण्यासाठी मुदत 30 सप्टेंबर 2023पर्यंतची दिली असून ही नोट वैधच राहणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
आरबीआयचा 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता 2000 रुपयांच्या नोटा बदलून जमा केल्या जातील आणि या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासंदर्भात बॅंकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही शक्तीकांत दास म्हणाले.
आता बाजारात विविध मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, 2000 रुपयांच्या 30 सप्टेंबर 2023पर्यंत बॅंकांमध्ये सहजपणे जमा करून बदलता येतील आणि तोपर्यंत त्या नोटा वैधच असतील. या कालावधीत दुकानदार असो वा पेट्रोलपंप चालक कोणीही ही नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून या कालावधीत जनतेला शांतपणे नोट बदलता येईल. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे, असे सांगून ते म्हणाले, 2000 रुपयाची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. बॅंकांना 2000च्या नोटांचा तपशील ठेवावा लागेल. यासाठी बॅंकांमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बाजारात इतर नोटांचा तुटवडा नसल्याने लोकांनी बॅंकेत येण्याची घाई करू नये, असे आवाहनही शक्तीकांत दास यांनी केले.