औरंगाबाद – 2012 मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. तेव्हापासून आजतागायत गुटखाबंदी लागू आहे, गुटखा कुठं आढळल्यास अन्न व औषध प्रशासन कारवाई सुद्धा करते. मात्र, खर्च राज्यात गुटखा बंदी आहे? असा प्रश्न देखील कधी-कधी आपल्या समोर उपस्थित राहतो. अवैधपणे गुटखा विक्री सर्वच ठिकाणी सुरू आहे. विशेष म्हणजे तरुण मुलंसुद्धा गुटख्याच्या विळख्यात अडकली आहे.
10 रुपयाला 3 पुड्या ते 30 रुपयांची 1 पुडी… वेगवेगळ्या ब्रँडनुसार प्रत्येकाची वेगळी किंमत असते. शहरातील कुठल्याही पानटपरीवर गुटखा सहजपणे मिळून जातो. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आणि याच पाच रुपयांच्या गुटख्यामुळे एकाने आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गणेश जगन्नाथ दास ( वय 37, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. एक दिवस कंपनीच्या मालकाच्या घरी गणेश डिश टीव्ही बसवण्यासाठी गेले होते. मात्र, गणेश यांना गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्यांनी नेहमी प्रमाणे आपल्या खिश्यातुन गुटख्याची एक पुडी फोडून ती तोंडात घातली.
आणि याचवेळी त्यांना जोराचा ठसका लागला आणि ते बेशुद्ध होऊन पडले. आणि तात्काळ गणेश यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्तरांनी गणेश यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवाला नुसार, गणेश जगन्नाथ दास यांच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील गुटख्याच्या विळख्यात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.