पुणे – करोना प्रादुर्भावामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायात चीनविषयी संतापाचे वातावरण आहे. अशातच चीनने भारताच्या लडाख, गलवानमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. या सर्व घडामोडींमुळे भारतात चीनविषयी संताप उसळला आहे.
चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्यासाठी देशभरातून स्वदेशीचा नारा बुलंद होत आहे. ठिकठिकाणी चिनी मालाची होळी करीत, देशी वस्तू वापरण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. देशभक्तीची लाट कायम ठेवल्यास चीनची काही प्रमाणात आर्थिक कोंडी करणे शक्य आहे. यासाठी नारिकांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.
चिनी बनावटीच्या वस्तूंबाबत देशात कायम विरोधी वातावरण आहे. आता, तर गलवानच्या विषयावर चीनने भारतीय लष्करावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच चीनला धडा शिकविण्यासाठी बाजारपेठेतील चिनी वस्तूंवर कायमचा बहिष्कार टाकणे गरजेचे आहे. याकरिता दैनंदिन वापरातील वस्तू देशी बनावटीच्या खरेदीस प्रत्येक भारतीयाने प्राधान्य दिले पाहिजे.
– प्रमिला वाघमारे, शिक्षिका
चीन भारतावर हल्ला करून, जवानांना मारत असेल तर अशा कृतीचा आम्ही निषेध करतो. अशा देशाच्या वस्तू मी स्वत: खरेदी करणार नाही. माझे स्वत:चे छोटे ब्युटी पार्लर असून, याठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू भारतीय बनावटीच्या असतील, याची मी काळजी घेणार आहे. तसेच, सर्व नागरिकांनीदेखील चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन करत आहे.
– माधवी लोंढे, ब्युटीपार्लर चालक
अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या वतीने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत, त्या जाळण्याचे जाहीर कार्यक्रम घेतले जात आहेत. देशातील सर्व नागरिकांचा यात सक्रिय सहभाग असल्यास चीनची आर्थिक कोंडी करायला वेळ लागणार नाही. जनजागृतीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम देशभरात आयोजित करण्याची गरज आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
– निर्मला गायकवाड, गृहिणी
चिनी कंपन्यांना भारतातील अनेक कामांची कंत्राटे दिली जात आहेत. चीन आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करीत असेल तर पुढील काळात चिनी कंपन्यांना ही कंत्राटे न देण्याचे शहाणपण राज्य व केंद्र सरकारने दाखवावे. केवळ चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चालणार नाही; तर अशा कोट्यवधी रुपयांची विकासकामे थांबवून चीनची आर्थिक रसद तोडली पाहिजे.
– संजय मोरे, व्यवसायिक
चीनच्या भारतविरोधी कृतीने प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. अखंड भारताची एकता दाखविण्याची हिच वेळ आहे. करोनाच्या प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेला चीनबाबतचा रोष आणि भारताच्या हद्दीतील आक्रमणाचा मुद्दा या दोन्हींमुळे देशभक्तीची पेटलेल्या आगीत चिनीमाल बहिष्काराच्या संदेशाचा वेगाने प्रसार करून चीनची आर्थिक कोंडी करावी.
– मनोज हरपळे, व्यावसायिक