चित्तूर :- देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे त्याचा लाभ उठवत आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील एक शेतकरी अल्पावधीतच कोट्यधीश झाला आहे. आपण या भाववाढीच्या काळात तब्बल तीन कोटी रुपये कमावले असल्याची माहिती त्याने दिली आहे.
हा शेतकरी चित्तूर जिल्ह्यातील करकमंदा गावातील आहे. त्याचे नाव चंद्रमौली असे आहे. त्याने 22 एकर शेतात टोमॅटोची लागवड करून 3 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 20 लाख रुपये कमिशनमध्ये गेले आणि 10 लाख रुपये वाहतूक आणि इतर खर्च झाले. एकूण 3 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न मिळाल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे.
या कुटुंबाने टोमॅटो पिकाचे नुकसान अनेक वेळा चाखले आहे, पण तरीही पुन्हा तेच पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा यंदा त्याला लाभ झाला. 7 एप्रिल रोजी साहू जातीच्या टोमॅटोची 22 एकरांत लागवड त्याने केली. या पीक वाढीसाठी त्याने सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला.
जूनच्या अखेरीस उत्पन्नाला सुरुवात झाली. जिल्ह्यापासून जवळच असलेल्या कर्नाटकातील कोलार बाजारात उत्पादनाची विक्री केली. लिलावात 15 किलोच्या पेटीची किंमत 1000 ते 1500 इतकी मिळाली असून त्याने सुमारे 40 हजार पेट्यांची विक्री केली. आज हा टोमॅटो उत्पादक शेतकरी कोट्यधीश झाला आहे.